नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिल आणि मिलिंडा गेटस् फाउंडेशनने 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबवल्यामुळे त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते मोदींना पुरस्कार देण्यात आला.
"ज्या लोकांनी स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनामध्ये बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत आहे. तसेच भारत पाणी वाचवण्यासाठी जलजिवन अभियान, फिट इंडिया अभियानावरही काम करणार आहे. आम्ही आमच्या उद्दिष्टांच्या जवळ जात आहोत." असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. मोदी सरकारने २०१४ साली स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाद्वारे देशामध्ये स्वच्छतेसंदर्भात मोठे काम करण्यात आले. देशामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक शौचालये मोठ्या प्रमाणावर बांधण्यात आली. तसेच घन कचऱ्याचे व्यवस्थपानही व्यवस्थितपणे करण्यात आले. त्यामुळे मोदींना पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले.
गेटस् फाउंडेशनद्वारे दरवर्षी 'ग्लोबल गोलकिपर पुरस्कार' देण्यात येतो. 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल' साध्य करण्यासाठी केलेल्या कामांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. स्वच्छ भारत अभियानापूर्वी देशामध्ये ५० कोटी लोकांकडे शौचालय नव्हती. मात्र, आता बहुसंख्य लोकांकडे शौचालये आहेत. स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये भारताला अजून खूप काम करायचे आहे. मात्र, स्वच्छ भारत मिशनमुळे देशामध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे बिल गेटस् फाउंडेशनने सांगितले आहे. भारतामध्ये राबवण्यात आलेले स्वच्छता अभियान जगामध्ये नमुना म्हणून राबता येऊ शकते. गरिबांच्या जिवनामध्ये स्वच्छता वाढण्यास त्यामुळे मदत होईल, असे फाउंडेशनने सांगितले आहे.