नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने सणासुदीनिमित्त ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयतर्फे गृहकर्ज, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जासह सर्व किरकोळ कर्जांना रेपो रेटशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना मिळणार आहे. १ ऑक्टोबरपासून नवे व्याजदर लागू केले जातील.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वीच बॅंकांना कर्जांचे दर थेट रेपो रेटशी जोडण्याचे निर्देश दिले होते. १ ऑक्टोबरपासून या निर्देशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. बॅंकांना मिळणाऱ्या सवलतीचा लाभ ग्राहकांना देता यावा यासाठी आरबीआयने ही पावले उचलली आहेत. तसेच तीन महिन्यांतून एकदा रेपो दराची पुनरचना करण्याची गरज असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले होते.