मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सलामीवीर माधव आपटे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भारताकडून खेळताना त्यांनी ७ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. क्रिकेटसोबतच ते एक उद्योजकही होते. त्यांनी 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे.तसेच, ते मुंबईचे नगरपालही होते.
माधव आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ मध्ये केली. आपटे यांनी १९५२- ५३ या काळात ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा १६३ धावांचा त्यांचा हा विक्रम १८ वर्ष अबाधित राहिला होता. आपटे यांनी मुंबईकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये २०७० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६ शतकांसह ६७ सामन्यांत ३३३६ धावा आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबईचे नगरपालपद भूषविले होते.