शरद पवार कान उघडून ऐका : शाह यांनी सुनावले खडेबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2019
Total Views |


 



मुंबई : 'कलम ३७०'वरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यावर असताना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. पाच ऑगस्टपासून काश्मिरात एकही गोळी चालली नाही. या निर्णयामुळे दहशतवाद हद्दपार झाला आहे. या निर्णयाचे तुम्ही समर्थन करता की विरोध हे स्पष्ट करा, असे आवाहन पवार आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केले.



 

 

देश एकसंध ठेवण्याच्या निर्णयाला तुमचा विरोध का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला. तुम्ही आदिवासी किंवा मागासवर्गासाठी अॅट्रोसिटी कायदा आणता, मग तो कायदा काश्मिरातील मागासवर्गीयांना का नको. कलम ३७० हटल्याने तिथल्या जनतेला सर्वाधिकार मिळाले आहेत. जे राज्यघटनेने त्यांना दिले होते. मग आता तुमचा विरोध का ते स्पष्ट करा, असे खडेबोल अमित शाह यांनी पवार यांना सुनावले.



 

 

"देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली, पण 'कलम ३७०' काश्मीरसाठी कळीचा मुद्दा ठरत असल्याने आपण स्वतंत्र असल्यासारखे वाटत नव्हते. केवळ परिवाराचे हित पाहणाऱ्या काँग्रेसने ३७० कलम हटविण्यासाठी कधी प्रयत्नच केले नाहीत. पण देशात मागील पाच वर्षात चांगले काम केल्यानंतर जनतेच्या विश्वासाच्या बळावर मोदी सरकारने काशमीरमधून 'कलम ३७०' हटविले आणि देश खऱ्या अर्थाने अखंड झाला.", असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढले.





जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या या ऐतिहासिक निर्णयावर अमित शाह यांचे गोरेगाव पूर्व येथील मुंबई प्रदर्शन केंद्र येथे रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव, महसुलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 

 


अमित शहा म्हणाले की, ३७० आणि ३५ ए कलम हटविल्यास देशात दंगेधोपे उसळतील, अशी भीती काँग्रेसकडून दाखविली जात होती. पण ऑगस्ट २०१९ ला ३७० कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये एकही गोळी झाडली गेली नाही की एकही मृत्यू झालेला नाही.नागरिक तेथे सन्मानाने राहत आहेत. ३७० मुळे भारतीयांना जम्मू काश्मीरमध्ये पाय ठेवता येत नव्हते, तो हक्क बजावणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांची हत्या झाली. काश्मीरसाठी पाहिले बलिदान त्यांनी केले. मात्र त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच भारतीय जनता पक्षाने काश्मीरमधून ३७० हटवून देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखले. देश अखंड राखला. कलम ३७० मुळे ९०-२००० मध्ये हिंदू पंडितांचे काश्मीरमधून स्थलांतर झाले. १९७९ पासून आजपर्यंत ४०००० लोक मारले गेले, हे विरोध करणाऱ्या राहुल गांधी लक्षात घ्यावे, असे शहा म्हणाले.



 

 

मुंबईतील प्रत्येक जागेवर कमळ फुलवू : आ. मंगलप्रभात लोढा

 

३७० कलम रद्द केल्यानंतर अमित शहा यांच्या हा पहिलाच मुंबई दौरा होता. त्यामुळे त्यांचे विचार ऐकायला लोकांची गर्दीही मोठी होती. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजक मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. महाराष्ट्र विधानसभेत मुंबईतील प्रत्येक जागेवर कमळ फुलवू, असा आत्मविश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

 

नेहरू-अब्दुल्ला समझोता

"स्वातंत्र्यानंतर हैदराबाद भारतात आणण्याचे मोठे काम वल्लभभाई पटेल यांनी केले. नंतर त्यांनी काश्मीरसाठी प्रयत्न केले. सैनिकही प्रयत्नांची शिकस्त करत होते. पण नेहरूंनी युद्धविराम केला. १९५० मध्ये वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यू झाला आणि १९५२ मध्ये शेख अब्दुल्ला आणि नेहरू यांच्यात समझोता होऊन काश्मीरमध्ये ३७० कलम जारी झाले," अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

३७० हटविल्याचे फायदे


काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यामुळे देश अखंड


एक निशाण, एक विधान, एक संविधान


शांततेने जगण्याचा मार्ग


पर्यटनाला चालना


दहशतवादाचे उच्चाटन


विकासाला चालना


मागासवर्गीयांचा विकास


एट्रोसिटी ऍक्ट लागू


सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोग


बालविवाहाविरोधात कायदा


दिव्यांगांसाठी कायदा


अँटिकरप्शन ब्युरो लागू होऊन काश्मीर भ्रष्टाचारमुक्त होईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@