नवी दिल्ली : ९२ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘गली बॉय’ या चित्रपटाला नामांकन देण्यात आले. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी ‘गली बॉय’ची भारताकडून निवड करण्यात आली. ’गली बॉय’सह ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक,’ ‘केसरी,’ ‘बधाई हो,’ ’आर्टिकल १५’ आणि ‘अंधाधुन’ आदी चित्रपट ‘ऑस्कर’वारीच्या स्पर्धेत होते. मात्र, या सर्वांमधून ‘गली बॉय’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. गेल्या वर्षी भारताने ‘ऑस्कर’साठी ’व्हिलेज रॉकस्टार’ची निवड केली होती. ‘गली बॉय’ या चित्रपटात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे. झोया अख्तरने याचे दिग्दर्शन केले आहे. या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गली बॉय’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा’चा पुरस्कारही ‘गली बॉय’ला मिळाला होता.