मुंबईच्या पूर्व उपनगरांतल विविध भागात गॅसची दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी सोशल मीडियावर केली होती. काही रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना संपर्कही साधला. या तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या. दरम्यान, या प्रकरणाची दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. महापालिकेने सर्व रासायनिक कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, 'देवनार, मानखुर्द, चेंबूर, विक्रोळी, दिंडोशी, विलेपार्ले, कांदिवली, दहिसर भागात सध्या अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या रवाना झाल्या असून गॅस गळती नेमकी कुठे झाली आहे याचा तपास सुरू आहे. सकाळी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, मात्र महापालिकेने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे ट्विट करत स्पष्ट केले. 'राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती आम्हाला सुरुवातीला मिळाली होती, मात्र 'आरसीएफ'मध्ये गॅस गळती झालेली नाही.', अशी माहिती पालिकेने दिली.