इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर वारंवार युद्धाची धमकी देणार्या पाकिस्तानचे अवसान रणसंग्रामाआधीच गळाल्याचे चित्र आहे. “भारताविरोधात युद्ध झाल्यास परंपरेप्रमाणे आपण युद्ध हरू शकतो,” अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी रविवारी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युद्धातील पराभवाबाबत भाष्य केले.
अण्वस्त्रांच्या वापराबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले, “मी असे म्हटले होते की, पाकिस्तान कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटणार नाही, असे मला वाटते. युद्धाचे अनपेक्षित परिणाम दिसतात. व्हिएतनाम, इराक युद्धाचे गंभीर परिणाम दिसत आहेत. जेव्हा दोन अण्वस्त्रसंपन्न देश पारंपरिक युद्ध करतात, तेव्हा ते युद्ध अण्वस्त्राने संपण्याची शक्यता असते. जर पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्धात हरत असेल तर देशाकडे दोन पर्याय असतील. एकतर शरण येणे किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणे. अशावेळी पाकिस्तान अखेरपर्यंत लढेल आणि जेव्हा कोणी अण्वस्त्रसंपन्न देश अखेरपर्यंत लढतो, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम होतात,” असे ते म्हणाले.