भोपाळ : मध्य प्रदेशात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. भोपाळ शहरामधील खटलापुरा घाटावर बोट उलटल्याने ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बोटीमध्ये एकूण १८ जण होते. इतर ७ जणांना वाचवण्यात यश आले. राज्य आपत्ती निवारण पथकाने बचाव आणि मदतकार्य हाती घेतले आहे.
बुडालेल्या ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गणपती विसर्जनाला आलेले सर्वजण पिपलानी येथील क्वार्टर ११०० मधील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उप-महानिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. राज्याचे मंत्री पी. सी शर्मा घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य आणि बचावकार्याचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.