मुंबई : राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील गळती थांबता थांबत नाही आहे. एकामागोमाग एक झटके या पक्षांना बसताना राज्यभर दिसत आहे. राष्ट्रवादीचे कोकणात नेतृत्व करणारे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का बसला आहे.
कोकणामध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेतृत्व असलेले भास्कर जाधव यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवले होते. मात्र, आपल्या कर्तृत्वाला राष्ट्रवादीमध्ये फारसा वाव मिळत नसल्याची त्यांची भावना होती. त्यातूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.