मुंबई ( अक्षय मांडवकर ) : मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शीव नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शहरात अजस्त्र मगरींनी शिरकाव केला आहे. चिपळूण रेल्वेस्थानकापासून व्यापारी संकुले आणि मानवी वस्त्यांमध्ये मगरींचा वावर आढळून येत आहे. या मगरींची सुखरूप सुटका करण्यासाठी वनविभाग तत्परतेने काम करत असून गेल्या महिन्याभरात शहरातील विविध भागांमधून नऊ मगरींचा बचाव करण्यात आला आहे.
कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण शहरातून वाहत जाणाऱ्या वाशिष्ठी व शीव नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, यामुळे चिपळूण शहरात राहणाऱ्या नागरिकांना एका निराळ्या समस्येला समोरे जावे लागत आहे. चिपळूण शहरातील विविध भागांत सध्या मगरींचा वावर सुरू आहे. खासकरून वाशिष्ठी आणि शीव नदीलगत वसलेल्या मनुष्य वस्त्यांमध्ये मगरी शिरकाव करत आहेत. दोन्हीं नद्यांमध्ये मगरींचा अधिवास फार पूर्वीपासून आहे. या मगरी 'मार्श' या प्रजातीच्या असून त्यांचे मुख्य अन्न मासे व इतर छोटे जलचर प्राणी आहेत. साधारणपणे नदीच्या मुख्य प्रवाहात आढळणाऱ्या मगरी पावसाळी हंगामात विशेषत: पूरसदृश परिस्थितीत उपनद्या किंवा छोट्या ओहोळांमध्ये स्थलांतर करत असल्याची माहिती 'सिस्केप' या संस्थेचे सदस्य गणेश मेहेंदळे यांनी दिली. हे स्थलांतर नैसर्गिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सावित्री नदीत आढळणाऱ्या मगरींवर मेहेंदळे संशोधनाचे काम करत आहेत. मगरींनी स्थलांतर केलेल्या भागांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास त्या स्वरक्षणाकरिता मानवी वसाहतीत शिरकाव करत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, पावसाळ्यानंतर मगरी पु्न्हा प्रवाहात परतत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat