नवी दिल्ली : मोदी सरकारच्या 'कलम ३७०' रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे आक्रमक भूमिका घेतलेल्या पाकिस्तानने आता भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणकार व अर्थतज्ज्ञांच्या मते पाकिस्तानचा हा निर्णय म्हणजे, 'विनाश काले विपरीत बुद्धि', ठरणारा आहे. व्यापारी संबंध तोडल्याने भारताला फारसा फरक पडणार नाही. मात्र, आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला याचा चांगलाच फटका बसणार आहे.
भारत-पाकमध्ये १८ हजार कोटींचा व्यापार
भारताचा व्यापार हा आशिया आणि पूर्व मध्य देशांशी जास्त होतो. पाकिस्तानच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवरच होणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. पुलवामा हल्ल्यापूर्वी पाकिस्तानसह झालेल्या व्यापाराची आकडेवारी लक्षात घेतली असता १८ हजार कोटी इतकी उलाढाल व्यापारातून झाली होती. त्यात २० टक्के आयात तर ८० टक्के निर्यात केली गेली. या आर्थिक वर्षात निर्यात ७.४ टक्के वाढून २ अब्ज डॉलरवर पोहोचले होते. २०१८-१९ मध्ये पाकिस्तानातून केली जाणारी आयात ४७ टक्क्यांनी घटली. तर भारतातून केली जाणारी निर्यात ३२ टक्क्यांनी घटून केवळ १७.१३ टक्के इतकी झाली.
या मालाची केली जाते पाकिस्तानला विक्री
ताजी फळे, सिमेंट, सुका मेवा, खनिजे, चामडे, रासायनिक उत्पादने, कापूस, मसाले, रबरी उत्पादने, मद्य, वैद्यकीय उपकरणे, समुद्री उपकरणे, प्लास्टीक, खेळाचे साहित्य इत्यादी.