पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत - आरोग्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 

मुंबई : राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी १६२ वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पुर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे १४ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, अशी माहिती आज आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

 

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कोकण भागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर तर मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तसेच विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस असून अन्य भागातही पावसाचा जोर कमीअधिक प्रमाणात आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या पुरग्रस्त असल्याचे प्राथमिक अहवालावरुन दिसून येत आहे. त्यापैकी सर्वाधिक गावे कोल्हापूर विभागात ३६ तर ठाणे विभागात १८ असून सातारा आणि नाशिक येथे अनुक्रमे ३ व २ गावे पुरग्रस्त आहेत.

 

पुर असलेल्या भागात ठाणे मंडळामध्ये ११४ वैद्यकीय पथक कार्यरत आहेत. कोल्हापूर मंडळात ३७, पुणे १० अशी राज्यभर सुमारे १६२ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत पुरग्रस्त भागातील सुमारे ४० विहीरींचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. कोकण विभाग, नवी मुंबई, ठाणे, मुंबई या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे तेथे पावसाचे पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो.

 

नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करावे, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. साथरोगांवरील औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूवरील उपचाराच्या सुमारे नऊ लाख गोळ्या उपलब्ध असल्याचा दिलासा देतानाच लेप्टोवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@