नवी दिल्ली : जम्मू -काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे बहुचर्चित कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ३७० हटवण्यासाठीचे विधेयक मांडले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. ३७० हटवून जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयकानुसार शाह यांनी जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले.
आतापर्यंत लडाख हा जम्मू-काश्मीरचाच भाग मानला जात होता. मात्र, नवीन विधेयकानुसार लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच जम्मू-काश्मिरात विधानसभेचे अस्तित्त्व कायम राहणार असल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तेथील नागरिकांमध्ये अनेक दिवसांपासून मागणी असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.
चर्चेस तयार, चर्चा करावी
विरोधकांनी घातलेल्या गदारोळानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना खणखणीत उत्तर दिले. काँग्रेस आणि विरोधकांनी चर्चा करावी, आम्ही चर्चेस तयार असल्याचे शाह यांनी सांगितले. कलम ३७० हटवण्यास आता उशीर करून चालणार नाही. यासाठी काँग्रेस आणि विरोधकांनी गोंधळ न घालता चर्चा करावी, मी सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असल्याचे शाह यांनी विरोधकांना सुनावले.