नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (बसप) पाठिंबा दिला आहे. राज्यसभेमध्ये बसपचे महासचिव सतीशचंद्र मिश्रा यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करत ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीरमधील दलित व वंचित घटकाला कलम ३७० रद्द केल्यास न्याय मिळू शकतो, असे मिश्रा यांनी यावेळी सांगितले.
बसपच्या या भूमिकेचे सरकारकडून स्वागत करण्यात आले. कलम ३७० रद्द केल्यास तेथील नागरिकांना त्यांचे हक्क मिळू शकतात, अशी भूमिका सरकारने मांडली आहे, तर शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले. कलम ३७० हटवण्याला विरोध करणाऱ्यांनी मागील ७० वर्ष काश्मिरी जनतेचे शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयाला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचे सांगितले.