यापूर्वी भारतीय नौदलानेही कच्छमार्गे पाकिस्तानकडून दहशतवादी कट रचला जाण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर श्रीलंकेमार्फत लष्कर-ए-तोयबाचे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्कतेवर आहेत. लष्करचे बरेच दहशतवादी श्रीलंकेतील जलमार्गाने तामिळनाडूच्या सीमेवर दाखल झाले आहेत अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) कोइंबतूरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
गुजरात पोलिसांनी म्हटले आहे की, “सुरक्षा यंत्रणांचे लोक कांडला बंदरावर पोहोचले आहेत. याठिकाणी २४ तास सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत. तटरक्षक दल, नेव्ही, सागरी पोलिस आणि स्थानिक पोलिसांना परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. गुजरातच्या बंदरांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कच्छच्या आखाती आणि सर क्रीकच्या खाडीतून दहशतवादी छोट्या बोटीमार्गे गुजरातमध्ये दाखल होऊ शकतात असे वृत्त आहे. काही काळापूर्वी सीमा सुरक्षा दलाने गुजरातमधील कच्छ जिल्ह्याजवळ भारत-पाक सीमेजवळ हारामी नाला खाडी भागातून पाकिस्तानी फिशिंगच्या दोन रिकाम्या बोटांना ताब्यात घेतले. या बोटी जप्त केल्यावर बीएसएफने शोध मोहीम सुरू केली, पण त्या भागातील बोटसहित कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.