देशविघातक कॅन्सरच्या गाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2019
Total Views |


 


डाव्या आणि उजव्या मेंदूला लकवा मारल्याने अरुंधती रॉयसारख्या प्रवृत्ती पाकिस्तानच्या, फुटीरतावाद्यांच्या, माओवाद्यांच्या मांडीवर खेळू-बागडू लागतात. बुद्धीमांद्य आल्याने असंबद्ध, काल्पनिक, तथ्यहीन बडबड करत मग ही मंडळी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळतात. भारतीय लष्करावर बिनबुडाचे आरोप करताना अरुंधती रॉयना पाकिस्तानने आपल्याच नागरिकांना कुत्र्याच्या मौतीने मारल्याचे, अन्याय-अत्याचार-बलात्कार केल्याचे, ३० लाख लोकांचे बळी घेतल्याचे दिसत नाही.


अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या, मानवाधिकाराच्या नावाखाली राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या, देशाच्या एकता-अखंडतेला कुरतडणाऱ्या, थोडे थोडे करून खाणाऱ्या कॅन्सरच्या गाठींचे काय केले पाहिजे? तर नक्कीच त्यांना उखडून फेकले पाहिजे, नेस्तनाबूत केले पाहिजे, अशीच प्रतिक्रिया भारतमातेचा कोणीही सच्चा सपूत देईल. विशेष म्हणजे आपल्या देशात अशा कॅन्सरच्या गाठींचे अधूनमधून पेव फुटत असते आणि त्यातून त्यांचा उपद्रवही समोर येताना दिसतो. 'अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है', 'जंग रहेगी जंग रहेगी, भारत की बर्बादी तक जंग रहेगी', 'भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह', अशा घोषणांच्या, कारवायांच्या रूपात या गाठी कधी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तर कधी जादवपूर विद्यापीठात प्रकटतात. आताही 'टुकडे टुकडे गँग'पैकीच एक असलेली आणि स्वदेशद्वेषाचाच शिक्का माथी मिरवणारी कॅन्सरची गाठ ठसठसून वर आली-जिचे नाव अरुंधती रॉय. 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' या पुस्तकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रॉयबाई सदानकदा स्वतःच्या विकृत विचारांचा चिखल उडवताना दिसतात. स्वतःला 'बुकर पुरस्कार' मिळाल्याने तर बाईंचा तोरा काही औरच असतो व म्हणून आपल्याला देशविरोधी बोलण्याचा परवाना मिळाल्याच्या थाटातही त्या वावरत असतात. कधी छत्तीसगढमधील माओवाद्यांचे समर्थन करत तर कधी जम्मू-काश्मिरातील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देत देशाच्या सामाजिक-राजकीय वातावरणाला नासवण्याचे काम त्या करत असतात. आताही पुरस्कारवापसी टोळक्याच्या म्होरक्या असलेल्या अरुंधती रॉय यांनी अशीच विघातक भूमिका घेतली व पाकिस्तानी लष्कराबद्दल प्रेमाचा पान्हा फुटल्याने भारतीय लष्कराविरोधात गरळ ओकली.

 

"पाकिस्तानने कधीही आपल्या नागरिकांविरोधात लष्कराचा वापर केला नाही. पण, स्वतःला 'लोकशाही देश' म्हणवणाऱ्या भारताचे मात्र तसे नाही. भारताने लष्कराच्या साहाय्याने आपल्याच नागरिकांना प्रताडित केले. स्वातंत्र्यापासूनच काश्मीरमध्ये मुस्लिमांवर, गोव्यात ख्रिस्त्यांवर, पंजाबात शिखांवर आणि तेलंगण व पूर्वोत्तरातील वनवासींवर भारताने लष्कराच्या बळावर अन्याय-अत्याचार केले. हा लष्कराच्या जोरावर देशातील सवर्ण हिंदूंनी वनवासी समाजाचे व अन्य धर्मीयांचे दमन, शोषण करण्याचाच प्रकार होता," असे तारे अरुंधती रॉय यांनी तोडले. अरुंधती रॉय यांची ही विधाने ऐकल्यानंतर जेएनयु विद्यार्थी संघाचा अध्यक्ष असलेल्या कन्हैय्या कुमारची आठवण होते. काही महिन्यांपूर्वी "भारतीय लष्कराचे सैनिक काश्मिरात बलात्कार करण्यात सर्वात आघाडीवर असतात," असे तो बरळला होता. अरुंधती रॉय आणि कन्हैय्या कुमार यांचे कूळ एकच-देशविरोधाचे, राष्ट्रघाताचे आणि भारत विखंडनाचे. अर्थात स्वदेशाभिमानाची, स्वदेशप्रेमाची जाणीव खुंटीवर टांगली की, आपल्याकडच्या अभ्यासक, विचारवंत आणि अभिव्यक्तीचे, मानवाधिकाराचे तथाकथित रखवाले ताळतंत्र सोडतात. डाव्या आणि उजव्या मेंदूला लकवा मारल्याने अरुंधती रॉयसारख्या प्रवृत्ती मग पाकिस्तानच्या, फुटीरतावाद्यांच्या, माओवाद्यांच्या मांडीवर खेळू-बागडू लागतात. बुद्धीमांद्य आल्याने असंबद्ध, काल्पनिक, तथ्यहीन बडबड करत मग ही मंडळी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळतात.

 

भारतीय लष्करावर बिनबुडाचे आरोप करताना अरुंधती रॉयना पाकिस्तानने आपल्याच नागरिकांना कुत्र्याच्या मौतीने मारल्याचे दिसत नाही. बांगलादेश जन्माला येण्याच्या आधी पूर्व पाकिस्तान या आपल्याच ताब्यातील प्रदेशात राहणाऱ्या सर्वसामान्यांना पाकिस्तानने सळो की पळो करून सोडले. बांगला अस्मितेला कट्टर इस्लामी वळण देण्याचे प्रयत्न पूर्व पाकिस्तानी जनतेने अमान्य केल्याने पाकिस्तान व लष्कराने मिळून तिथल्या नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या सरसकट कत्तली केल्या. जवळपास 30 लाख बांगला जनतेचा बळी पाकिस्तानने आपल्या वर्चस्वाच्या वखवखीतून घेतला. शरीराची खाज मिटवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने, सैनिकांनी बांगला मुली-महिलांच्या आयुष्याची बलात्कार, अत्याचाराने राखरांगोळी केली. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या किळसवाण्या कृत्यांच्या निशाण्या गर्भात घेऊन भटकणाऱ्या बांगला स्त्रियांच्या किंकाळ्या आणि आरोळ्यांनी आसमंतही थरारून उठे. पूर्व पाकिस्तानचे तत्कालीन नेते आणि बांगलादेशचे पिता मानल्या जाणाऱ्या शेख मुजीबूर रहमान यांनीच या सर्व गोष्टी जाहीरपणे सांगितल्या होत्या. बांगलादेशचे उदाहरण जुने वाटत असेल तर बलुचिस्तान, खैबर-पख्तुनख्वा, सिंधकडे पाहा. तिथेही पाकिस्तान आपल्या लष्कराच्या साहाय्याने दडपशाही, मुस्कटदाबीच करते. म्हणूनच तिथली माणसे आता भारतापासून ते अमेरिका, इंग्लंड, संयुक्त राष्ट्रांपर्यंत तक्रारी करताना, आशेने पाहताना दिसतात. परंतु, आंधळ्या-बहिऱ्याचे सोंग घेतलेल्या अरुंधती रॉयना हे कसे दिसेल? उलट त्या टाळ्या वाजवत पाकिस्तानचेच गोडवे गातील, कारण अरुंधती रॉय यांच्या तुकड्यांची आणि रंगीत पेयाच्या चषकांची सोयही तिथूनच होत असेल!

 

दुसरीकडे सरकारच्या धोरणांना, नीतीला विरोध करण्याचा अधिकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला आहेच. सरकारच्या एखाद्या मुद्द्याशी सहमत-असहमत असणे, यातही काही वावगे नाही. पण, अरुंधती रॉय यांची जीभ आणि लेखणीही देश तोडणाऱ्या ताकदींच्या बाजूनेच चराचरा चालते. भोळ्याभाबड्या वनवासींना फसवणाऱ्या, भुलवणाऱ्या माओवाद्यांना, नक्षलवाद्यांना त्या निष्पाप ठरवू पाहतात. यासिन मलिक आणि सय्यद अली शाह गिलानी या काश्मिरातील फुटीरतावाद्यांना रॉयबाई पाठिंबा देतात. सरकारच्या भूमिकेविरोधात जाऊन काश्मीरच्या आझादीची स्वप्ने रंगवतात. अरुंधती रॉय यांचा महिमा इतका की, पाकिस्तानी नेतेही त्यांच्या भरवशावर आपल्या देशात बडबडू लागतात. भारताने जम्मू-काश्मीरविषयी महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर मुशाहिद हुसैन या पाकिस्तानी नेत्याने जियो टीव्हीवरील एका चर्चासत्रात, अरुंधती रॉय, ममता बॅनर्जी, काँग्रेस व कम्युनिस्टांना आमच्याबद्दल सहानुभूती व समानुभूती वाटत असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. यावरूनही पाकिस्तान आणि अरुंधती रॉय यांच्यात काही ना काही संबंध असल्याचे स्पष्ट होते. आताच्या आपल्या विधानांवरून अरुंधती रॉय यांचा देशात सवर्ण हिंदू आणि वनवासी व अन्य धर्मीयांत झगडा लावण्याचा, देशांतर्गत संघर्षाचा भडका उडवण्याचा इरादा असल्याचेही दिसते. म्हणूनच अरुंधती रॉय यांनी लष्कराला सवर्ण हिंदू ठरवत इतरांना पीडित, शोषित दाखवले. परंतु, काश्मीरपासून चेन्नईपर्यंत आणि उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात वा पूर्वोत्तरातील पूर-महापूर, नैसर्गिक आपत्तीत धावून येणारे, अगदी परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या बचावासाठी मैदानात उतरणारे लष्कर अरुंधती रॉयसारख्या अस्तनीतल्या निखाऱ्यांना कधी दिसले नाही. तसेच दहशतवाद्यांनी, माओवाद्यांनी सांडलेले निरपराध भारतीयांचे रक्तही त्यांना दिसत नाही, सर्वसामान्यांच्या कालव्याने त्या अस्वस्थ होत नाहीत, उलट आपल्याच कल्पनाविलासात दंग होतात. पण, म्हणून अशा देशघातक्यांचे बुरखे फाडण्याचे, या कॅन्सरच्या गाठी दाखवून देण्याचे काम सोडता येत नाही, ते काम सुरूच ठेवावे लागते.

@@AUTHORINFO_V1@@