महादेव जानकर साहेबांची औकात चौकात नसून शिवाजी पार्कात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |


 

 

ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

 

मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत असून रासप वटवृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महादेव जानकर साहेबांची ताकद चौकात नसून शिवाजी पार्कापर्यंत पोहोचली असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा १६ वर्धापन दिन दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राहुल कुल, प्रवीण दरेकर, बाळासाहेब दोडतले, अभिनेत्री सपना बेदी, चित्रपट निर्माते अजय अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

रासपची राज्यात ताकद वाढली आहे. रासपचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. नगरपालिका, बाजार समितीवर रासपचे वर्चस्व आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रासपचा योग्य जागा देऊन सन्मान केला जाईल. आधीच्या सरकारने राज्याला लुटण्याचे काम केले. धनगर समाजाची फसवणूक केली. जातीपातीत तेढ निर्माण करून सत्ता भोगली. त्यांची ही चाल सर्वसामान्य जनतेने २०१४ सालीच ओळखली. येणाऱ्या निवडणुकीतदेखील सर्वसामान्य जनता भाजप, शिवसेना, रासप आणि रिपाइं (ए) या महायुतीसोबत रहाणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आशीर्वाद घेऊनच राज्यकारभार सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही जातीपातीला थारा न देता महायुतीला मतदान करावे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताकदीची भाजपला जाणीव आहे. रासपचा योग्य जागा देऊन सन्मान केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी महादेव जानकर म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची १५ वर्षे राज्यात सत्ता होती. या पक्षांनी इतर मागासवर्ग, दलित, आदिवासी आदी समाजांवर अन्याय अत्याचार केले. धनगर समाजाच्या आरक्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे जानकर यांनी उपस्थित समाजबांधवांना सांगितले. ते पुढे म्हणाले कीराष्ट्रीय समाज पक्ष २७ राज्यात पसरला असून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या चार राज्यात रासपला पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या ताकदीचा विचार करून आम्हाला जागा द्या, अशी मागणी जानकर यांनी मुंडे यांच्याकडे केली. तसेच आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे घोषित केले.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्यातील पाच नंबरचा पक्ष आहे. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप, शिवसेना नंतरचा तिसरा पक्ष म्हणून उदयास येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत जीवाचे रान करून पक्षाच्या उमेदवाराचे काम करावे, असे राज्यमंत्री दोडतले यांनी सांगितले. जानकर साहेबांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाचा ८० टक्के प्रश्न सुटला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळाला मागताक्षणीच १००० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे, महादेव जानकर यांनी केली असल्याचे राज्यमंत्री दोडतले यांनी सांगितले.

 

अभिनेता संजय दत्त करणार रासपमध्ये प्रवेश

 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनाला अभिनेता संजय दत्त यांनी व्हिडिओ वरून शुभेच्छा दिल्या. तसेच रासपच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

 

रासपची भाजपकडे ५७ जागांची मागणी

 

राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यात ताकद वाढली आहे. पक्षाचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनेक नगर पालिका बाजार समित्या रासपच्या ताब्यात आहेत. पक्षाच्या ताकदीचा विचार करूनच भाजपकडे ५७ जागांची मागणी केली असल्याचे नामदार महादेव जानकर यांनी उपस्थित जनसमुदायस सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@