मुंबई : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी म्हटले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रकार अत्यंत निषेधदायक आहे. सध्याची काँग्रेस ही गांधींची नाही, तर नेहरूंच्या पिलावळीची आहे. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. आपल्या अस्तित्वासाठी पुन्हा काँग्रेसला सावरकरांचाच मुद्दा घ्यावा लागतो, ही एक दुर्दैव बाब म्हणावी लागेल,” अशी जळजळीत टीका त्यांनी यावेळी केली.
एनएसयुआय संघटनेबाबत बोलताना ते म्हणाले, “ही संघटना म्हणजे काँग्रेसचेच पिल्लू आहे. काही नराधमांनी पुतळ्याची विटंबना केली. पण जनतेच्या मनातून सावरकर कसे घालवाल? महात्मा गांधी, यंग इंडिया २६ मे, १९२० चा संदर्भ गांधीजींचे सावरकरांबद्दलचे मत मांडले आहे. त्यात गांधी म्हणतात की, सावरकर हुशार आहेत, शूर आहेत ते आमूलाग्र क्रांतिकारक आहेत. ब्रिटिश सत्तेचे हिडीस स्वरूप त्यांनी माझ्या कितीतरी आधीच ओळखले होते. देशावर प्रेम करण्याची किंमत ते आज अंदमानात चुकवत आहेत. त्यांचा सुटकेचा अर्ज सरकारने मान्य करावा, हेच न्यायसंगत आहे. ज्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. त्या ७० वर्षांत सत्ता असताना लाख प्रयत्न करूनही जे जमले नाही ते आता तर तुम्हाला शक्यच नाही, राहुल आणि सोनिया गांधींची चर्चेत राहण्याची ही शेवटची धडपड असून मोदींनी, अमित शाह यांनी आता यांना धडा शिकवायलाच हवा, ”असेही रणजित सावरकर यांनी म्हटले.