राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणाईसमोर एक ‘जेटली मार्ग’ आहे आणि दुसरा ‘चिदंबरम मार्ग’ आहे. जेटली मार्ग व्यवस्था, कायदा, संविधान यांचा आदर बाळगणारा आहे. ‘चिदंबरम मार्ग’ सत्तेचा गैरवापर करणारा, देशाच्या व्यवस्थेशी खेळणारा, कायदा वाकविणार आणि अखेर चौकशीला सामोरे जावे लागणारा आहे. जनहिताचे, भ्रष्टाचारमुक्त राजकारण करणे ही अरुण जेटली यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
‘अभाविप ते भाजप’ असा अरुण जेटली यांचा प्रवास होता. अरुण जेटली यांच्या या प्रवासात अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार भाटिया यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अरुण जेटली यांचा जन्म दिल्लीतील आर्थिकदृष्ट्या सक्षम, सुखवस्तू कुटुंबातील होता. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. त्यावेळच्या दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळातील होते. स्वाभाविकच भोवताली सुबत्ता असणारे अरुण जेटलीही त्याच वर्तुळात लहानाचे मोठे झाले होते. त्या काळातील अशा उच्चभ्रू घराण्यातील मुलांचा काँग्रेसकडे जाण्याचा ओढ होताच ; अन्यथा करिअर करण्यासाठी विदेशात जाण्याचा ट्रेंड होता. अरुण जेटली अभाविपच्या संपर्कात आले. नंतर ते दिल्ली विद्यापीठाचे अध्यक्ष होते. विद्यार्थी नेता म्हणून त्यांची कामगिरी प्रभावी होती.
तो सगळा काळ जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनाचा होता. उत्तम इंग्रजी, नेमकी अभ्यासू मांडणी, आकर्षक व्यक्तिमत्त्व असे अरुण जेटली दिल्ली विद्यापीठाचे अध्यक्ष असताना त्यांना त्याचवेळी काँग्रेसचे निमंत्रण आले होते. पण, अरुण जेटली यांनी आपला राजकीय निर्णय अभाविपच्या प्रा. राजकुमार भाटिया यांच्यावर सोडला होता. यथावकाश आणीबाणीविरोधी लढ्यात तत्कालीन जनता पक्षात आणि मग भाजपमध्ये अरुण जेटली सक्रिय होत गेले. आपली वकिली उत्तमपणे करून ते नावलौकिक मिळवत होते. व्यावसायिक आघाडीवर यशस्वी असणार्या अरुण जेटली यांचा दिल्लीच्या वर्तुळात दबदबा निर्माण होत होता. अटलजी-अडवाणी या नंतरच्या भाजपच्या पिढीतील एक प्रमुख नेते म्हणून अरुण जेटली ओळखले जात होते. ‘मास लिडर’ म्हणून रूढार्थाने लौकिक नसला तरी नेतृत्वाचा ‘क्लास’ जपताना ते कधी वादग्रस्त झाले नाहीत. आपल्या मर्यादांची जाण ठेवून त्यांचा वावर होता. ‘आर्टिक्युलेशन’ हे त्यांचे बलस्थान होते.
मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अभाविपच्या प्रा. बाळासाहेब आपटे यांच्या श्रद्धांजली सभेतील त्यांचे भाषण हे त्यांच्यातील प्रामाणिक, प्रभावी आणि संघटन शरण कार्यकर्त्याचे दर्शन घडवणारे होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शीतपेयातील घटकांवरून मोठी बातमी आणि चर्चा झाली होती. त्यावेळी शीतपेयांचे युरोपियन आणि भारतीय स्टॅण्डर्ड यावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले होते. ‘अशोका मार्गा’वरील भाजप कार्यालयाला शेजारी असलेला ‘नऊ’ क्रमांकाचा बंगला त्यांना मिळाला होता. या बंगल्याचा वैयक्तिक वापर न करता, पक्षाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना निवास म्हणून तो उपलब्ध करून दिला. सरकारी बंगले कुटुंब, नातेवाईक यांच्यासाठी किंवा चक्क भाड्याने देण्यासाठी असा प्रकार सर्रास होत असताना अरुण जेटली त्या बंगल्याच्या मोहापासून दूर राहिले होते. हातात इंग्रजी पुस्तक ही त्यांची ओळख होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यात, गर्दीत अरुण जेटली असे चित्र नव्हते. अरुण जेटली यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये आकर्षण आणि दडपण होते. पण, योजनेतून किंवा व्यवस्थेतून जाणार्या कार्यकर्त्याला ते आवर्जून भेटत असत. वेळ देऊन त्याचे म्हणणे ऐकून घेत असत. काम होण्यासारखे असेल तर ‘हो’ म्हणत किंवा होणारे नसले तर थेट ‘नाही’ म्हणत.
दिल्लीतील उच्चभ्रू पत्रकारांच्या वर्तुळातही अरुण जेटली यांचा दबदबा होता. 2014च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी ही भाजपची गरज आहे, हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना, त्यावेळच्या पक्षाच्या केंद्रीय नेत्यांपैकी ते बहुदा पहिले असावेत, ज्यांनी मोदी यांच्या पारड्यात आपले मत टाकले होते. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राजकीय विरोधकांनी एनजीओ आणि कथित सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलेले खटले, तक्रारी यासाठी त्यांनी मोदी यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अरुण जेटली यांच्या काही ठोस भूमिका होत्या. ठाम मतं होती. पण, त्यांनी पक्ष विरोधात भूमिका घेतली नाही. आपले उच्चभ्रूपण पक्षावर लादले नाही. निष्कलंक राजकीय कारकिर्द ही अरुण जेटली यांची ओळख कायम राहील. कुठलाही आरोप, वाद अरुण जेटली यांच्या अवतीभोवती फिरकू शकला नाही.
राज्यसभेतील त्यांची कामगिरी स्मरणात राहणारी आहे. विरोधकांचा समाचार घेताना त्यांची भाषा संयमी, पण मार्मिक होती. राजकारण उपजीविकेचे साधन नसून तो लोककल्याणाचा मार्ग आहे, हे भान अरुण जेटली यांनी जपले. आपल्या प्रकृतीच्या मर्यादा लक्षात घेऊन अरुण जेटली यांनी मंत्रिपद नाकारून एक आदर्श निर्माण केला आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणाईसमोर एक ‘जेटली मार्ग’ आहे आणि दुसरा ‘चिदंबरम मार्ग’ आहे. जेटली मार्ग व्यवस्था, कायदा, संविधान यांचा आदर बाळगणारा आहे. ‘चिदंबरम मार्ग’ सत्तेचा गैरवापर करणारा, देशाच्या व्यवस्थेशी खेळणारा, कायदा वाकविणार आणि अखेर चौकशीला सामोरे जावे लागणारा आहे. जनहिताचे, भ्रष्टाचारमुक्त राजकारण करणे ही अरुण जेटली यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
- मकरंद मुळे
८१०८०००५६४