मुंबई : राज्यातील पूरस्थिती काहीशी निवळली असली तरीही पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे हे मोठे आव्हान असून त्यासाठी मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे पूरग्रस्त भागात सर्वोतोपरी मदत केली जात आहे. तसेच पूरग्रस्तांना समाजातील सर्व संस्था, व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. मंगळवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंहामंडळ (एमआयडीसी) यांच्यातर्फे एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्यात आली आहे.
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्य मुख्य सचिव अजोय मेहता, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. अन्बलगन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतनिधीचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.