'मिशन मंगल' ही फक्त एक कथा नसून भारताचा मंगळवार जाण्याचा प्रवास या कथेमध्ये सामावलेला आहे. आणि या कथेचा गाभा म्हणजे यातील धैर्यवान महिला, ज्यांच्या सामर्थ्यामुळे हे मंगळ मिशन पूर्णत्वास गेले. ही कथा आहे त्या ५ महिलांची ज्यांच्या जिद्दीमुळे मंगळ मिशनची स्वप्नपूर्ती भारतीयांना दिसली. जे आधी अशक्य होते ते शक्य करून दाखवत भारत हे मिशन यशस्वीपणे पार करणारा पहिलाच देश ठरला. आणि म्हणूनच 'मिशन मंगल' या चित्रपटाच्या टीमतर्फे या महिलांच्या बुद्धिमत्तेला सलाम करणारा व्हिडीओ आज प्रदर्शित करण्यात आला.
विशेष म्हणजे हा व्हिडीओ मराठीमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे तर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मराठीतून एक कविता या व्हिडीओमध्ये म्हटली आहे. ही कविता कथेतील नारीशक्तीला समर्पित करण्यात अली असून यामध्ये त्याच्या आवाजाने या महिलांविषयी त्याला असलेला अभिमान प्रतीत होत आहे.
येत्या १५ ऑगस्टला 'मिशन मंगल' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मात्र तत्पूर्वी हा व्हिडीओ पाहून प्रत्येक स्त्री ला आपल्या अस्तित्वाचा अभिमान वाटेल असा हा व्हिडीओ आज टीम मिशन मंगलने प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओला रितेश देशमुखकडून वाहवा देखील मिळाली आहे. दरम्यान 'मिशन मंगल' या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे.