मुंबई : मुसळधार पावसानंतर राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागांमध्ये कोरडे हवामान दिसून येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यातील तापमानात वाढ झाली असून मुंबईमध्येही तापमान वाढून दमट वातावरण तयार झाले आहे. या वातावरण बदलानंतर पुढील तीन ते चार दिवस मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊन वातावरण जवळजवळ कोरडे राहणार असल्याचा इशारा स्कायमेटने दिला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, उत्तर कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होईल तर काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिणेकडील जिल्ह्यात थोडयाफार प्रमाणात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागांत पुढील दोन दिवसात मुसळधार तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.