मुंबई : कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सिनेसृष्टी आणि उद्योगजगतातील कोणीही मदत करत नसल्याची टीका होत असतानाच बिग बी अमिताभ बच्चन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बच्चन यांनी ५१ लाखांचा तर रिलायन्सने ५ कोटींचा मदतनिधी दिला आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगलीत आलेल्या पूरामुळे जीवनमालाचे भरपूर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना, मजुरांना आणि ज्यांची घरं उद्धवस्त झाली अशा सर्वांनाच मदतीचा हात द्या, अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात येते आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार पुढे येऊन मदत करत असले तरी हिंदी सिनेसृष्टीतील कोणीही मदतीचा हात पुढे केला नव्हता. सलमान खान वगळता या पुराची दखलही कोणी घेतली नव्हती. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला कर्मभूमी मानणाऱ्या अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरूख खानसारख्या दिग्गज कलाकारांवर भरपूर टीका होत होती.
पण आता अमिताभ बच्चन यांनी ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करून या टीकेला पूर्णविराम दिला आहे, तर दुसरीकडे उद्योगजगतातील अग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच कोटींची मदत जाहीर केली आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आनंद अंबानीने पाच कोटींचा चेक मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या मदतीबद्दल फडणवीस यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.