नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांची आज प्रथम पुण्यतिथी. त्यानिमित्ताने 'सदैव अटल'स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली. सदैव अटल स्मृती स्थळावर वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाजपेयींची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिकासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य स्मृती स्थळी उपस्थित आहेत. वाजपेयींच्या स्मृतीदिनानिमित्त सदैव अटलवर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
१६ ऑगस्ट २०१८ रोजी अटलबिहारी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या विकासात वाजपेयींची भूमिका महत्वाची ठरली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी भारत पाकिस्तान संबंध सुधारावे यासाठी प्रयत्न केले. भारतातील छोटी शहरे, खेडे रस्ते व महामार्गांची जोडण्याचे महत्वपूर्ण काम अटलजींनी त्यांच्या कार्यकाळात केले. मे 1998 मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. 1974 नंतर भारताने केलेली ही अणुचाचणी होती. भारत हा देखील अण्विक शक्ती असलेला देश आहे हे दाखवून देण्यासाठी ही अणुचाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर भारत हा एक शक्तिशाली देश म्हणून जगासमोर आला. २०१४ मध्ये अटल बिहारी वाजपेयींना देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.