नवी दिल्ली : हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा काश्मीरमध्ये घातपात घडविण्याचा कट होता. तो कट आम्ही उधळून लावल्याचे काश्मीरचे मुख्य सचिव बी. व्ही. सुब्रह्मण्यम यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. कलम ३७० रद्द केल्यानंतर सीमाभागातील दहशतवादी कारवायांवर निर्बंध यावे याकरिता केंद्र सरकार कडून अनेक निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. आज रात्रीपर्यंत दूरध्वनी आणि इंटरनेट सेवाही टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येईल.
जम्मू काश्मीर मधील २२ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये आता शांतता आहे व ज्या ५ जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण आहे त्याभागात शांततेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुरक्षेच्या कारणावरून बंद असलेली दूरध्वनी आणि इंटरनेट सुविधाही काही दिवसात सुरु करण्यात येईल. काश्मीरमधील परिस्थिती हळू हळू पूर्ववत होत असून , सोमवार पासून शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.