नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरण येथे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. "भारताने आजपर्यंत कधीच अण्वस्त्राचा वापर केला नाही. मात्र भविष्यात काय घडेल हे परिस्थितीवर अवलंबून आहे." असे यावेळी त्यांनी सांगितले.
"मी आंतरराष्ट्रीय सैन्य स्काऊट स्पर्धेसाठी जैसलमेरला आलो होतो. आज योगायोगाने अटलबिहारी वाजपेयी यांची पहिली पुण्यतिथी आहे. त्यांना पोखरणच्या भूमीवर श्रद्धांजली अर्पण करणेच योग्य आहे." असे राजनाथ सिंह म्हणाले. १९९८मध्ये पोखरण येथे अणु चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते.
यापूर्वी राजनाथ सिंह यांनी अटळ बिहारी वाजपेयींवर फेसबूक पोस्ट लिहली होती. "अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील युगपुरुष होते. त्यांच्या आदर्श तत्वांमुळेच सुलभता आणि सुशासन याला राजकारणात चालना मिळाली. सबका साथ, सबका विश्वास या घोषवाक्याची प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली." असे राजनाथ सिंह यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले होते.