मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील ५ लाख, ६० हजार, ९५३ पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.
स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे २२, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल ३, तसेच नौदलाच्या १८, तटरक्षक दलाचे ८, आर्मी १७, उपलब्ध बोटी १६३ अशी पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत कोल्हापूर येथील ३ लाख, ३६ हजार, २९७ तर सांगली येथील १ लाख, ७४ हजार, ४८५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात २१० तर सांगली जिल्ह्यात १६८ तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ६१ हजार, २७ जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
बाधित गावे व कुटुंबे
कोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे - ३२१, बाधित कुटुंबे - ८१ हजार ८८ तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे -१०४ व कुटुंबसंख्या - ३४ हजार, ९१७ अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचावकार्य सुरू आहे. पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यात सतत संपर्क आहे. मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशावर तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.
राज्यातील इतर बाधित गावे
सातारा - १२३ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती -१०७५५), ठाणे - २५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती -१३१०४), पुणे - १०८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती -१३५००), नाशिक - ०५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - ३८९४), पालघर - ५८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - २०००), रत्नागिरी - १२ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - ६८७), रायगड - ६० गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - ३०००), सिंधुदुर्ग - ४६ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - ३२३१). असे एकूण कोल्हापूर आणि सांगली शहरासह ७१ बाधित तालुके तर ८६२ गावे आहेत.