पुणे : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी केली. शेलार यांच्या उपस्थितीत पुण्याच्या बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी शेलार यांनी आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत आणि तिरंदाज प्रवीण जाधव हे दोन खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. राहीने पिस्तूल नेमबाजीत, तर प्रवीणने सांघिक तिरंदाजीत पात्रता निकष गाठला आहे. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या या दोनच खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे. २४ जुलै २०२० ते ९ ऑगस्ट २०२० दरम्यान जपानची राजधानी टोकियो या शहरात ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.