मुंबई : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, नाशिक, कोकण व अन्य जिल्ह्यात पूरस्थिती ओढवली. आता पूर ओसरत असला तरी पूरग्रस्तांचे पुनर्वसनाचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातील पुनर्वसनासाठी राज्य सरकारने ६८१३ कोटींची मदत करणार असल्याची घोषणा आज केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात १ ते १० ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी झाली. त्यामुळे राज्यात मोठे नुकसान झाले असून राज्याने याबाबत केंद्र सरकारला माहिती दिली आहे. पुरामुळे झालेल्या हानीचा अंदाज घेऊन केंद्र सरकारकडे ६८१३ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यापैकी ४,७०० कोटी रुपये कोल्हापूर, सांगली व साताऱ्यासाठी तर, उर्वरित २१०५ कोकण, नाशिक व इतर जिल्ह्यांना दिले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. "केंद्र सरकारकडून ही मदत मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे. तोपर्यंत राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून भरपाई दिली जाईल. घरे, शाळा, जनावरे, पिकांसह सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारकडून केली जाईल. पडझड झालेली घरे पूर्ण बांधून देण्यात येतील," असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.