नवी दिल्ली : "फक्त काश्मीरच नव्हे तर पाकिस्तानही भारताचाच एक भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे, हे मान्य करायला हवे," अशा शब्दांमध्ये ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरू इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच, "काश्मीर हा कधीच पाकिस्तानचा भाग होऊ शकत नाही," असे सांगत टोकाची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानलाही चांगलीच चपराक लगावली.
“काश्मीर कधी पाकिस्तानचा भाग नव्हताच आणि यापुढेही असणार नाही. पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचेच भाग आहेत. मुस्लीम हिंदू धर्म सोडून इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा असल्याचे सत्य बदलता येणार नाही. भारत हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षाही जुना आहे, हे मान्य करायलाच हवे.” असे ट्विट करत इमाम तौवहिदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. याआधीदेखील त्यांनी पाकिस्तानची दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारी कारस्थाने पाहून सुनावले होते.