आहे म्युच्युअल फंड तरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2019
Total Views |



गेल्या आठवड्यात बाजाराने अजिबात उसंत न घेता रोजच आपटी खाल्ली. आपल्याकडे श्रावण 'पाळण्या'ची संस्कारी शिकवण आहे. बाजार श्रावणात निर्देशांकांची हिरवळ दाखवेल की श्रावणसरी बाजाराची स्वच्छता करतील येत्या काळात हे अनुभवायला मिळेलच.

 

एका खाजगी संस्थेने (YouGuv) केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात गुंतवणूक साधनांमध्ये मुदत ठेवी पहिल्या क्रमांकावर, विमा योजना दुसर्‍या, तर म्युच्युअल फंड योजना तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्याखालोखाल सोने, पीपीएफ, शेअर्स असा क्रमांक लागतो. सोबतचा तक्ता बघा. पुढील लेख 'म्युच्युअल फंडाबद्दल सर्व काही' असेच असतील. पण या आठवड्यात बाजार आणि म्युच्युअल फंडबद्दल समाज माध्यामांवरून इतकी नकारात्मकता पसरविली गेली की बाजार पुढील आठवडाभर बंद राहणार, अशीदेखील हाळी देण्यात येत आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडची थोडी पार्श्वभूमी माहीत करून घेण्याचा प्रयत्न या लेखात करू.

 

१९९८ साली भारताने १०० कोटी लोकसंख्येचा टप्पा गाठला, तर २०१७ च्या अखेरीस आपण अजून ३३ कोटींनी वाढून जगात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचलो. २०२४ साली लोकसंख्यात्मक दृष्टीने आपण 'विश्वानुज' झालेले असू. भारतात सध्या ० ते १४ वयोगटातील २८.६ टक्के, १५ ते ६४ वयोगटातील ६३.६ टक्के आणि ६५ व त्याहून अधिक वयोगटातील ७.८ टक्के अशी लोकसंख्येची विभागणी आहे. म्युच्युअल फंड उद्योगाने याच वर्षी सत्तावीसावा वर्धापन दिन साजरा केला.

 

कमवित्या वयोगटाचा विचार केल्यास म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांची एकूण संख्या केवळ १.९६ कोटी इतकीच आहे. याचे कारण आपल्या देशात ९३ टक्के लोक त्यांचे करपात्र उत्पन्न १ ते २.५ लाख या गटात असल्याचे दाखवितात. आता ते बदलून एक ते पाच लाख या गटात दाखवतील. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेतून व्यवहार करणे बंधनकारक आहे. भारतात विमा विक्रेत्यांची संख्या २२ लाखांपेक्षा जास्त आहे, तर म्युच्युअल फंड विक्रेते आहेत ८५ हजार. त्यातदेखील पूर्णवेळ काम करणारे वैयक्तिक म्युच्युअल फंड विक्रेते १० हजारांहून अधिक नाहीत. त्यामुळे महिना ५ हजार रुपये कमविणार्‍या व्यक्तीकडे गुंतवणूक म्हणून विमा योजना आहे. परंतु, फक्त गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडची योजना नसते.




 

वर्षानुवर्षे ७ टक्के ते ९ टक्के वार्षिक परतावा देणार्‍या मुदत ठेवीत पैसे गुंतविणार्‍या व्यक्तीस म्युच्युअल फंडच्या जाहिराती पाहून वार्षिक १५ टक्के परताव्याचे वेध लागतात. मुदत ठेवी स्थिर उत्पन्नासाठी, तर समभाग म्युच्युअल फंड योजना भांडवली लाभासाठी असतात, हे मूळ शास्त्र कुणी समजून घेण्यास तयार नाही. सध्या काही सहकारी सेवा संस्था व पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवी परत काढून घेण्यास आग्रही आहेत. कारण त्यांच्याकडे कर्जदार नसल्याने ठेवीदारांना व्याज देण्यास उत्पन्नच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग या ठेवीदारांना म्युच्युअल फंड हा पर्याय खुणावू लागतो. अशा गुंतवणूकदारांनी अगोदर स्वतःचीजोखीम स्वीकारण्याची क्षमता तपासली पाहिजे. ते न करता अधिकचा परतावा हा निकष विक्रेत्याला सांगतात आणि मग तोदेखील समभाग सलंग्न योजनेत पैसे गुंतविण्यास सुचवितो. मुदत ठेवीच्या पावतीवर पाठीमागे दर तीन महिन्याला किंवा नूतनीकरणाच्या वेळी व्याज लिहून आणण्याची सवय असल्यामुळे वर्षभरानंतर खाते उतारा बघितल्यावर 'म्युच्युअल फंड नको रे बाबा' अशी धारणा बनते.

 

भारतात १८७५ साली वडाच्या झाडाखाली वायदे बाजाराची म्हणजेच आजच्या 'बॉम्बे स्टॉक मार्केट'ची मुहूर्तमेढ रोवली गेली, तर त्याच दरम्यान अमेरिकेत १८९० साली म्युच्युअल फंडची सुरुवात झाली. 'युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया'च्या माध्यमातून १९८६ साली भारतात अधिकृतरीत्या 'म्युच्युअल फंड'ची सुरुवात झाली, तर १९९३ मध्ये खाजगी आस्थापनांना या व्यवसायात पदार्पण करण्याची संधी मिळाली. म्युच्युअल फंडची सोप्या शब्दांमध्ये व्याख्या करावयाची झाल्यास सामूहिक रकमेतून वस्तुनिष्ठ ध्येय ठरवून केलेली गुंतवणूक, असे करता येईल. कारण, म्युच्युअल फंडची योजना सुरू करताना वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठरवून गुंतवणूक घेण्याची मुभा नियंत्रकाकडून दिली जात असते.

भारतात आजमितीला ४४ मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या कार्यरत असून त्यांच्या २ हजार, ७०० पेक्षा जास्त गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. या सर्वांवर 'अ‍ॅम्फी' (AMFI) आणि 'सेबी' (SEBI) नियंत्रक म्हणून काम पाहत असतात. म्युच्युअल फंडमध्ये किमान एक दिवस ते कमाल अमर्याद कालावधीसाठी गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. यासाठी 'रेग्युलर' व 'डायरेक्ट' असे दोन पर्याय उपलब्ध असतात. गुंतवणूकदाराला त्याचे ध्येय माहीत असल्यास पर्याय निवडण्यास गल्लत होत नाही. आजवर भारतीय गुंतवणूकदारास वित्तीय साधन विकत घेण्याची सवय जडलेली असल्यामुळे म्युच्युअल फंडचा पर्याय तितकासा लाभदायक ठरलेला नाही. नियमित गुंतवणूक पर्यायात (SIP) दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून शिस्त पाळणारे गुंतवणूकदार ३३ टक्के आहेत, तर एक वर्षाच्या आत बाहेर पडणारे ४७ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.

 

१९ वर्षीय हिमा दासने १९ दिवसांत सहा वेळा भारताचा तिरंगा सुवर्णपदक मिळवून अभिमानाने उंचावला. तेव्हा समाजमाध्यमातून 'कुठे गेली बोर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स पिणारी पोरं?' अशा आशयाचे विनोदवजा संदेश फिरू लागले. त्यासाठी हिमा दासची असलेली मेहनत आणि ध्येय गाठण्यासाठीचा दृढनिश्चय, तिने मिळविलेल्या बक्षिसांच्या ५० टक्के रकमेचे दान बरेच काही सांगून गेले. तीन वर्षांसाठी मुदत ठेव करणारे, १५ वर्षे 'पीपीएफ'मध्ये दर महिन्यास न चुकता पैसे भरणारे म्युच्युअल फंडमध्ये सरासरी दोन वर्षांपेक्षा कमी काळ का टिकतात? हा मोठा गूढ प्रश्न आहे.

 

MG Vector कंपनीने त्यांच्या उत्पादन क्षमतेइतक्या म्हणजेच २१ हजार गाड्यांची नोंदणी झाल्यानंतर नवीन नोंदणी यावर्षाकरिता बंद केली आहे. याउलट भारतीय मोटार उत्पादक कंपन्यांचे नकारात्मक निकाल बाजाराला व परिणामी गुंतवणूकदाराला निराश करत आहेत. विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. गटारी अमावस्या आणि दीपपूजन एकाच दिवशी साजरा करण्याचा दुहेरी योग यावर्षी जुळून आला आहे.

 

अमावस्या साजरी करून दिवे लावायचे की दीपपूजन करून सकारात्मक आणि आश्वासक आशेचा किरण अनुभवायचा? हे आपल्यालाच ठरवायचे आहे.

सध्याच्या गुंतवणूकदारांची अवस्था युद्धभूमीवरील अर्जुनासारखी झाली आहे. या परिस्थितीत योग्य मार्गावर नेणारे सल्लागार, निर्णय आणि कृती यांचा योग जुळून येणे म्हणजे 'स्थितप्रज्ञ' होणे.

- अतुल प्रकाश कोतकर

[email protected]

९४२३१८७५९८

@@AUTHORINFO_V1@@