मुंबई : पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाचॆ बातमी आहे. ती म्हणजे पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस १५ दिवस बंद राहणार आहेत. तसेच, इतर काही एक्सप्रेसच्या वेळापत्रकांमध्येदेखील बदल करण्यात आले आहेत. तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट असे १५ दिवस पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लोणावळा ते कर्जतदरम्यान हे दुरुस्तीचे काम चालू करण्यात येणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.
मुंबईहून सुटणाऱ्या कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहेत. त्यामुळे या आठ दिवसांत प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, पुणे-भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार आहे. पुणे-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. नांदेड-पनवेल ही गाडी पुण्यापर्यंतच धावणार आहे. त्याचप्रमाणे या काळात पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat