काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद हा 'काटेरी मुकूट' ! : अशोक चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2019
Total Views |
 
 


मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद हा डोक्यावरील 'काटेरी मुकुट' आहे, अशी भावना काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केली. 'मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा हा नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला होता. मी यापुढे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणारच', असेही त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी बुधवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली.

 

'पक्षासाठी कधीही एकट्याने प्रयत्न करून चालत नाही, त्यात 'टीमवर्क' असल्यास चांगले परिणाम येतात', अशी सूचना करत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना आपण आपल्या सोबत असल्याचा विश्वास चव्हाण यांनी दिला. थोरात हे मृदू स्वभावाचे असल्याने त्यांचा लाभ पक्षाला होईल, असेही ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान 'वंचित'चा मोठा फटका आपल्या पक्षाला बसला. त्यामुळेच राज्यात बारा जागांवर त्यांचा थेट परिणाम झाला आणि मोठे नुकसान झाल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, "काँग्रेसने यापूर्वी पराभव पाहिलेला आहे, त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता लढायला तयार आहे. आता अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत थोरात यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, आम्ही सगळे लढायला तयार आहोत. तरीही आम्ही सत्ताधार्यांचे चार वर्षात जे वाभाडे काढायला पाहिजे होते ते काढू शकलो नाही, तिथे आपण कमी पडलो. तरीही आता वेळ गेली नाही. आपण एकेक पुरावे समोर आणले तर खरे स्वरूप समोर येईल. त्यामुळेच भाजपचा पराभव करणे शक्य होणार असून त्यासाठी यावेळी सावधगिरीने काम केले पाहिजे तरच लोकशाही वाचेल. त्यामुळे इतर पक्षासोबत चर्चा चांगली होईल, उमेदवार जाहीर करा, आणि कामाला लागू, असे चव्हाण म्हणाले.

 

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी थोरात यांचे कौतुक केले. राज्यात आपला कार्यकर्ता जोडण्याचे आणि जे बाहेर नाराज होऊन गेले असतील त्यांना पुन्हा परत बोलावून घेऊ या. १९८०  मध्ये इंदिरा गांधी यांनी बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यांच्या जीवावर चारशेच्या आसपास उमेदवार निवडून आणले होते. तसे आता आपण करू या असे आवाहन शिंदे यांनी केले. काँग्रेसचे नेते व गुजरातचे पक्ष प्रभारी राजीव सातव यांनी यावेळी ज्यांना पक्ष सोडून जायचे त्यांना जाऊ द्या, त्यांना बँडबाजा वाजवून पाठवून देऊ या, मात्र जे गेले, त्यांना पुन्हा परत घेऊ नका असे आवाहन केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@