जिथे प्रचंड प्रतिकूलतेचा अंधार आहे, अशा ठिकाणी स्वतःच्या आयुष्याचाच होम करत प्रकाशवाटा निर्माण करणारे, पशूसारखे जगत असणाऱ्या धर्मबांधवांचे जगणे माणूसपणाच्या कक्षेत यावे म्हणून स्वतःच्या सगळ्याच भौतिक सुखाला तिलांजली देऊन कार्य करणारे, सात जन्मात घरात कुणी अंडेही खाल्ले नसेल, पण वनवासी किंवा ईशान्य भारतातील बांधवांना परके वाटू नये म्हणून स्वतःच्या तोंडातली उलटी दाबून त्यांच्या घरी मुंगी, मांजर वगैरेही खाणारे, आयुष्याचा कण न् कण समाजासाठी झिजवणारे आणि शेवटी, ‘नाही चिरा नाही पणती’ असणारे हे लोक कोण आहेत? हे लोक तेच आहेत की, ज्यांनी स्वतःची प्रसिद्धी कधीही केली नाही. (मग केलेल्या सेवाकार्यांचे फोटोबिटो काढणे तर दूरची गोष्ट.) सदोदित ‘तेरा वैभव अमर रहे, माँ’ च्या जयघोषात प्राणाहुती द्यायचीही तयारी असणारे हे लोक कोणत्या मातीचे आहेत? यांना विचारायची सोयच नाही. कारण त्यांच्यासाठी ‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी’ आहे. १९२५ सालापासून ‘प्रसिद्धीपराङ्मुखता’ हा जन्मजात गुण ठरवून देशामध्ये लाखो समाजकार्य उभे करणाऱ्या या लोकांना कालपर्यंत अगदी अस्पृश्यच ठरवले गेले. १९४७ सालापासून सत्तालोलुप स्वार्थी लोकांच्या हेटाळणी, तिरस्कारांचे धनी कोण होते तर हेच लोक! पण, यांनी कधीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांचे काम, त्यांची निष्ठा केवळ आणि केवळ देशाशी राहिली. काही चांडाळचौकड्यांना वाटले की, यांचा खोटा इतिहास पसरवला, यांना कुठेही स्थान दिले नाही, तर हे आपोआप विस्मृतीत जातील. पण, कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. त्यामुळे त्यांनी इतिहास म्हणजे केवळ मुघल आणि इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेस इतकाच काय तो इतिहास जनमानसासमोर ठेवला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माणामधील भूमिका शिकवली जाणार आहे. अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची ही गोष्ट. हजारो वर्ष निद्रिस्त हिंदूंना त्यांच्या शक्तीची जाणीव करून इतिहास घडविणाऱ्या या लोकांचा अभ्यास तरुणाईने करायलाच हवा. देश, संस्कृती आणि धर्म यासाठी मानवी शाश्वत मूल्यांची लढाई करणाऱ्या या लोकांचा अभ्यास नुसता इतिहासात नव्हे, तर समाजशास्त्राच्या शाखेतही व्हायला हवा.
ना‘पाक’ म्हातारचळ
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat