इतिहास घडविणाऱ्यांची दखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019   
Total Views |

 
 

जिथे प्रचंड प्रतिकूलतेचा अंधार आहे, अशा ठिकाणी स्वतःच्या आयुष्याचाच होम करत प्रकाशवाटा निर्माण करणारे, पशूसारखे जगत असणाऱ्या धर्मबांधवांचे जगणे माणूसपणाच्या कक्षेत यावे म्हणून स्वतःच्या सगळ्याच भौतिक सुखाला तिलांजली देऊन कार्य करणारे, सात जन्मात घरात कुणी अंडेही खाल्ले नसेल, पण वनवासी किंवा ईशान्य भारतातील बांधवांना परके वाटू नये म्हणून स्वतःच्या तोंडातली उलटी दाबून त्यांच्या घरी मुंगी, मांजर वगैरेही खाणारे, आयुष्याचा कण न् कण समाजासाठी झिजवणारे आणि शेवटी, ‘नाही चिरा नाही पणती’ असणारे हे लोक कोण आहेत? हे लोक तेच आहेत की, ज्यांनी स्वतःची प्रसिद्धी कधीही केली नाही. (मग केलेल्या सेवाकार्यांचे फोटोबिटो काढणे तर दूरची गोष्ट.) सदोदित ‘तेरा वैभव अमर रहे, माँ’ च्या जयघोषात प्राणाहुती द्यायचीही तयारी असणारे हे लोक कोणत्या मातीचे आहेत? यांना विचारायची सोयच नाही. कारण त्यांच्यासाठी ‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी’ आहे. १९२५ सालापासून ‘प्रसिद्धीपराङ्मुखता’ हा जन्मजात गुण ठरवून देशामध्ये लाखो समाजकार्य उभे करणाऱ्या या लोकांना कालपर्यंत अगदी अस्पृश्यच ठरवले गेले. १९४७ सालापासून सत्तालोलुप स्वार्थी लोकांच्या हेटाळणी, तिरस्कारांचे धनी कोण होते तर हेच लोक! पण, यांनी कधीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांचे काम, त्यांची निष्ठा केवळ आणि केवळ देशाशी राहिली. काही चांडाळचौकड्यांना वाटले की, यांचा खोटा इतिहास पसरवला, यांना कुठेही स्थान दिले नाही, तर हे आपोआप विस्मृतीत जातील. पण, कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. त्यामुळे त्यांनी इतिहास म्हणजे केवळ मुघल आणि इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेस इतकाच काय तो इतिहास जनमानसासमोर ठेवला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माणामधील भूमिका शिकवली जाणार आहे. अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची ही गोष्ट. हजारो वर्ष निद्रिस्त हिंदूंना त्यांच्या शक्तीची जाणीव करून इतिहास घडविणाऱ्या या लोकांचा अभ्यास तरुणाईने करायलाच हवा. देश, संस्कृती आणि धर्म यासाठी मानवी शाश्वत मूल्यांची लढाई करणाऱ्या या लोकांचा अभ्यास नुसता इतिहासात नव्हे, तर समाजशास्त्राच्या शाखेतही व्हायला हवा.

ना‘पाक’ म्हातारचळ


 सय्यद शाह अली गिलानी, वय वर्षे ९०, तिकडे ७२ हूर जन्नतमध्ये इंतजार करत आहेत. पण, हे अजूनही इथेच. यांच्या चिथावणीमुळे कितीतरी काश्मिरी पोरं ‘हूर’च्या आशेत ‘हुर्रियत हुर्रियत’ करत देशद्रोह करून अल्लाला प्यारी झाली. काश्मीर आणि इतर ठिकाणी जवळजवळ २ डझन ठिकाणी अलिशान वास्तू यांच्या आणि यांच्या घरच्यांच्या नावावर. शिक्षक असलेल्या गिलानींची संपत्ती किती असावी? पब्लिक हिसाब लावते आहे २०० करोड की ३०० करोड? फुटीरतावादाचे नापाक जाळे विणणारे हे आणि यांच्या सोबत्यांची मुलं कोणत्याही इस्लामिक देशामध्ये नाही तर मुंबई-दिल्ली वगैरेंसारख्या शहरांमध्ये किंवा थेट लंडन अमेरिकेला शिकायला जातात, तिथेच राहतात. गिलानी यांचाही एक मुलगा श्रीनगरमध्ये आहे. बुर्‍हान वाणी मेल्यानंतर गिलानींनी काश्मीर बंद केले. शाळांनाही जबरदस्तीने टाळे लावण्यास भाग पाडले. सर्वसामान्य काश्मिरी कुढत होते की, आमच्या मुलांचे नुकसान का? मात्र, एक शाळा सुरू होती. तिथे सुखेनैव परीक्षाही सुरू होत्या. कारण, गिलानींची नात त्या शाळेत होती. त्यांच्या मुलाने त्यांना सांगितले की, “माझ्या मुलीचे नुकसान नको. आता परीक्षा दिली नाही तर तिचे वर्ष वाया जाईल.” त्यामुळे गिलानी यांच्या नातीच्या फायद्यासाठी संपूर्ण काश्मीर बंद असतानाही ती श्रीनगरची डीपीएस शाळा सुरू होती. (विशेष म्हणजे, या शाळेचे संचालक डी. पी. धार हे काँग्रेस नेहरू घराण्याचे अगदी निकटवर्तीय.) अर्धी नव्हे तर ९० टक्के हाडं कबरीमध्ये पोहोचल्यावरही गिलानी एका रॅलीत नुकतेच किंचाळताना दिसले, ‘हम पाकिस्तानी है, पाकिस्तान हमारा है।” पण, १९४७7 साली पाकिस्तान (सध्याचा भिकीस्तान) मुस्लीम देश म्हणून तयार झाला. त्यावेळी तर गिलानी तरुण होते, मग तेव्हा ‘इस्लाम के तालुक्कसे मोहब्बत से’ म्हणत गिलानी पाकिस्तानात का नाही गेले? असो, मृत्यूच्या वेळेस माणसाला वेध लागतात म्हणे, वयोवृद्धतेमुळे गिलानी यांना पाकिस्तानचे वेध लागले आहेत. भारत सरकारने गिलानी यांचे भारतीय नागरिकत्व काढून घ्यावे. कारण, धर्माचा चुकीचा अर्थ लावून देशविघातक कृत्य करणारे इथे नकोतच. (टीप-गिलानी यांचे वय पाहून ‘अरे-तुरे’ करणे टाळले.)
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@