'या' कारणांसाठी अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा ठरतो महत्वाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : जपानमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरन यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान रशियासोबत होणाऱ्या भारताच्या ए-४०० मिसाईल कराराचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. या दौऱ्यात रशियन रणगाडे भारतात आणण्यावरून अमेरिकेचा अडथळा दूर होईल अशी चिन्हे आहेत.

 

ट्रम्प-मोदी भेट

२८ आणि २९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. पॉम्पियो यांचा हा भारत दौरा अतिशय महत्वाचा आहे. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, पॉम्पिओ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतली आहे. दोघांनी दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. रशियाकडून भारताने एस-४०० क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या करारावर अमेरिकेचा आक्षेप असून त्यादृष्टीनेही चर्चा होऊ शकते.

 

फ्रान्सशी शस्त्रास्त्र करारावर आक्षेप

अमेरिकेने यापूर्वीच या करारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भारताने आपले शस्त्रास्त्र करार आणि व्यवहार अमेरिकेसोबतच ठेवावे असा अमेरिकेचा आग्रह धरला होता. परंतु, पॉम्पिओ यांच्या भारत दौऱ्यातून अमेरिकेचा तो अडथळा दूर होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

व्यापारविषयक अडथळ्यांवर चर्चा

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतात व्यापार आणि आयात करांवरून वाद आहेत. भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर देशात मोठा कर लावतो. परिणामी भारतात अमेरिकन वस्तू ज्यादा किंमतींवर विकल्या जातात. यात अमेरिकेचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ज्यादा कर लावण्यासह बदाम आणि सफरचंदांवर सुद्धा निर्बंधांचा इशारा दिला होता. परंतु, दोन्ही देशांत झालेल्या चर्चेनंतर तो वाद मिटला होता. त्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@