नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये रविवारी १६ जूनला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये महायुद्ध पाहायला मिळणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. परंतु, प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाने या सामन्याबाबत दोन्ही देशांमध्ये चालू असलेल्या जाहिरातबाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.
"क्रिकेट सामन्यावरून दोन्ही बाजूंकडून जे बाळबोध प्रकार सुरू आहेत त्याची खरेतर अजिबात गरज नाही. भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष आधीपासूनच लागले आहे. त्यासाठी आणखी जाहिरातबाजीची गरज नाही. हे केवळ क्रिकेट आहे. त्यापलीकडे काही नाही आणि कुणाला हे सगळे क्रिकेटच्या पलीकडचे काही वाटत असेल तर मग बसा तोच विषय धरून." अशी खोचक टीका तिने ट्विटरवरून व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या 'जॅझ टीव्ही'ने भारत-पाक लढतीच्या जाहिरातीत भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावरून विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, भारतीय वाहिनीने जाहिरात करताना टीम इंडिया पाकिस्तान संघाचे 'अब्बू' म्हणून संबोधले आहे. यावर सानिया मिर्झाने चांगलेच ताशेरे ओढले. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने २०१०मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाह केला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat