
मुंबई : राज्यात आतापर्यंत १२८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तर पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरु केल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून ८ लाख ५५ हजार ५१३ जनावरे दाखल झाले आहे.
१८ किलो हिरवा चारा मिळणार
राज्यातील छावण्यांमधील जनावरांच्या आहारामध्येही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चारा छावण्यांमध्ये दाखल मोठ्या जनावरांना यापूर्वी १५ किलोग्रॅम हिरवा चारा, उसाचे वाडे, ऊस दिला जात होता. आता मोठ्या जनावरांना दैनंदिन १८ किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जाईल. त्याचबरोबर लहान जनावरांना यापूर्वी ७.५ किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जात होता. आता त्यात वाढ करुन ९ किलो दैनंदिन चारा दिला जाईल.
छावण्यातील जनावरांना बारकोड
दुष्काळी भागात शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी छावणीमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येणार आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat