अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या भिवंडी लोकसभेची गणितं सुरुवातीला जातीच्या आधारावर मांडली जात होती. परंतु, सलग दुसर्यांदा विजय संपादन करून खा. कपिल पाटील यांनी इतिहास घडवला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरली असून सुरुवातीला कपिल पाटील यांच्या विरोधात काहीसे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून महायुतीसाठी शिवसैनिकांनी एकनिष्ठेने काम करण्याचे आवाहन केले होते. त्याचा फायदा निश्चितच कपिल पाटलांना झाला.
त्याचबरोबर आ. किसन कथोरे आणि मुख्यमंत्र्यांच्या कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटलांना ऐनवेळी महायुतीत घेऊन काँग्रेसची अर्धी हवाच काढल्याने भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड या ग्रामीण पट्ट्यात काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यात वंचित बहुजन आघाडीने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला असून शहरी भागातला काही प्रमाणात दलित व अल्पसंख्याक मतदार दुरावला आहे. तसेच भाजप नेत्यापासून बूथ प्रमुखापर्यंतची साखळी, बुद्धिजीवी लोकांची सोबत, माध्यमांवरील सकारात्मक प्रसिद्धी, विजयासाठी सर्व प्रकारची मेहनत, कार्यकर्त्यांची फौज सतत कार्यरत विरोधकांनाही आकर्षित व गप्प करण्याचे तंत्रज्ञान, पक्षावर प्रचंड विश्वास, शिवसेनेसोबत इतर घटक पक्षांची मदत यामुळे भिवंडीत भाजपचा विजय सहजसोपा झाला.
- नवीन पाटील
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat