
नवी दिल्ली : भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ मागील बर्याच काळापासून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ असलेल्या रोबोटची निर्मिती करत आहेत. मानवी बुद्धिमतेप्रमाणे हे रोबोसुद्धा परिस्थितीनुसार काम करण्यास सक्षम असतील. देशाच्या सीमांवर गस्त घालण्यासाठी, पहारा देण्यासाठी या रोबोंची तैनात करता येऊ शकेल. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.
“बंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी डिसेंबर २०१८ मध्ये रोबोटच्या निर्मितीवर काम सुरू केले. या प्रकल्पावर काम करणार्या शास्त्रज्ञांना डिसेंबर २०१९ पर्यंत रोबोटचा पहिला प्रोटोटाईप म्हणजे नमुना तयार करू, असा विश्वास आहे. सैन्यदलाला काही कठीण ऑपरेशन्स करावी लागतात. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे त्यामध्ये बदल होईल. आमचे रोबोटस सीमेवर गस्त घालण्यासाठीही सक्षम असतील,” असे बीईएलचे सीएमडी गौथामा एमव्ही यांनी सांगितले.
“बीईएलकडून रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अन्य उत्पादने यावर्षी बनून तयार होतील,” अशी माहिती संरक्षण उत्पादनाचे सचिव अजय कुमार यांनी दिली. सैन्यदलांनी अद्याप अशा कुठल्याही उत्पादनासाठी मागणी नोंदवलेली नाही. स्टीव्ह जॉब्स म्हणायचे, “युझरला जोपर्यंत तुम्ही उत्पादन दाखवत नाही, तोपर्यंत त्याला काय हवे आहे हे माहीत नसते.”
“सैन्याला उपयोगी पडतील अशी उत्पादने बनविण्याची आमची क्षमता आहे. हा तसाच प्रकल्प आहे,” असे गौथामा यांनी सांगितले. भविष्यातील युद्ध पारंपरिक पद्धतीने लढले जाणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उत्पादने निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. रोबोंना सीमेवर टेहळणीसाठी ठेवले तर सैनिकांचे प्राण वाचू शकतात.
“बीईएलकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोबोच्या प्रोटोटाइपचा आढावा घेतला जाईल. फेब्रुवारी २०२० पासून चाचण्या सुरू होतील. खास आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी असलेल्या तीन प्रयोगशाळांमधील ८० वैज्ञानिक आणि अभियंते या प्रकल्पावर काम करत आहेत. सध्या एका रोबोची अंदाजित किंमत ७० ते ८० लाख रुपये आहे,” असे गौथामा यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat