पंतप्रधान बनायचं, बनू दे न वं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2019   
Total Views |



माझी सगळी नाटकं झाली,

मला प्रधानमंत्री बनायचंय, बनू दे न वं...

शून्य माहिती असताना मोदींवर टीका करतो, करू दे न वं...

अमेठीमध्ये हिंदू, वायनाडमध्ये अहिंदू,

देश भावनेशी खेळतो, खेळू दे न वं...

 

राजकुमारांचे मनपसंत गीत.. राजकुमार म्हणून जनेऊ तिलक धारण करून ते अमेठीत वावरतात आणि अजिमोशानशहेनशाह बनून टोपी परिधान करून त्यांना वायनाडमध्येही जायचे आहे. पण, देशात काय चालले आहे याचा थांगपत्ता नाही. राजकुमारांना देशाचा पंतप्रधान व्हायचे आहे. इतके सर्वोच्च पद भूषवायचे आहे. मात्र, सध्या देशात काय चालले आहे? देशाची परिस्थिती कशी आहे? देशावर ज्यांची सत्ता आहे, त्यांच्या कारकिर्दीत देशामध्ये काय घडामोडी घडत आहेत? याबाबत राहुल गांधींनी जराही अभ्यास केलेला दिसत नाही. कारण, तसे नसते तर शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले नसते की, “सध्याची शिक्षणपद्धती ही बेरोजगार निर्माण करणारी आहे. विद्यापीठामध्ये कौशल्याधारित शिक्षण मिळत नसल्याने त्यात प्राधान्याने बदल करण्याची गरज आहे. या शिक्षणाच्या बदलाची ब्लू प्रिंट आमच्याकडे तयार असून सत्तेत आल्यावर आम्ही ती राबवू.” आता काय म्हणावे या विधानाला? राजकुमार यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्टार्ट आप योजना, मेक इन इंडिया या योजना माहिती नाहीत का? किंवा २०१४ पासून झालेला शिक्षणाचा व्यवसायभिमुख बदल माहिती नाही का? किंवा २०१४ नंतर सत्ताधारी पक्षाच्या कारकिर्दीमध्ये आयटीआय, आरव्हीटीआयमध्ये दहावीनंतर दोन वर्ष शिकलेल्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो, हे सुद्धा राजकुमारांना माहिती नसावे. असो पण, भाजपच्या पाच वर्षांच्या सत्तेपूर्वी १९४७ साल ते २०१४ यातली काही वर्ष सोडली तर काँग्रेस पक्षाचीच सत्ता होती. या कालावधीत जी शिक्षणपद्धती अमलात आणली, ती काँग्रेसप्रणित सरकारच्या विचारानेच असेल याचेही भान राजकुमारांना नसावेच. असो, यातून एक सिद्ध झाले. ते असे की, नसलेल्या ब्लू प्रिंटवर केवळ राज ठाकरेचांच कॉपीराईट नाही तर राजकुमार, अजिमोशानशहेनशहा ही नसलेली ब्लू प्रिंट काढू शकतात बरं का? सगळं कशासाठी? तर, कसंही करून मला पंतप्रधान बनायचंय, बनू दे न वं...

 

‘उनसे’चे ‘कानसे’

 

नोटाबंदीचा फटका कुणाला बसला असेल, असे वाटते? सर्वसामान्यांना? मध्यमवर्गीयांना? गरिबांना? जे कष्टाने भाजीभाकरी कमावतात त्यांना, की ज्यांनी या ना त्या माध्यमातून जनतेला लुटले, ते लुटीचे पैसे बाजारात वेळोवेळी फिरवले त्यांना? कुणाला बसला असेल नोटाबंदीचा फटका? “आमचे फारच नुकसान झाले हो. पाचशे हजारच्या नोटा या अशा पडून होत्या. त्यांचे गठ्ठे बँकेत बदलताना आम्हाला किती त्रास झाला?” असे गरीब जनतेने म्हटलेले ऐकले आहे का? दुर्दैवाने नोटाबंदीच्या काळात बँकेत रांगा लावणारे काही लोक या ना त्या कारणाने मृत्यू पावले. पण, तीही परिस्थिती पालटली. बाजारात नव्या नोटा आल्या. त्या व्यवस्थित उपयोगात आल्या. पैशाचे व्यवहार संगणकीय झाले आणि प्रत्येक पैशाच्या देवाणघेवाणीची क्रिया अत्यंत पारदर्शक झाली. ‘ना मै खाऊंगा, ना खाने दूँगा’ची घोषणा इतकी प्रभावीपणे अमलात आणली गेली की, मोदी लाटेत जिंकलेले कितीतरी खासदार-आमदार म्हणतात,“खरेच आहे हो.. १८-१८ तास पंतप्रधान स्वतः काम करतात आणि प्रत्येक गोष्ट संगणकीय व्यवहारातून होत असल्याने आता खासदार आमदार बनण्याची पूर्वीची अर्थपूर्ण गंमतच संपली. पण, तरीही हे खासदार-आमदार मोदींविषयी तक्रार करत नाहीत तर ते वास्तव सांगतात की, अर्थव्यवस्था किती सक्षम आणि पारदर्शक बनली.” असो, तर या पारदर्शक अर्थव्यवस्थेने ज्यांचे काळे धंदे उजाड झाले, अशा काही व्यक्ती सध्या पिसाळल्या आहेत. त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी नोटाबंदी आणि त्यामुळे झालेले नुकसान अक्षरशः अश्वत्थाम्याच्या जखमेसारखे छळत आहे, अस्वस्थ करत आहे. त्यातच नोटाबंदी करणाऱ्या पंतप्रधान आणि सरकारचा केसही वाकडा करू शकत नसल्यामुळे ही अस्वस्थता विकृत वेडात बदलली आहे. त्यामुळेच सरड्यापेक्षाही जलदगतीने रंग बदलणाऱ्या पक्षाचे नवे नामकरण जनतेने केले. ते म्हणते, ‘उनसे.’ ‘उनसे’ या सध्या जोरात गाजणाऱ्या लघुशब्दाचा दीर्घशब्द सांगायलाच हवा. ‘उनसे म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना.’ पण, काहींचे म्हणणे आहे, त्यात संघटनेचा काय दोष? संघटनेचा कर्ता करविता सध्या ‘कानसे’ झाला आहे, तर पक्षही ‘उनसे’ होणारच! (कानसे शब्दाचा खुलासा : कार्य नसलेला सेनापती)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@