अवकाशामधून धोका जाणवत असल्यामुळेच अॅण्टिसॅटेलाईट चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



वॉशिंग्टन : भारताला अवकाशामधून धोका जाणवत असल्यामुळेच त्यांनी अॅण्टिसॅटेलाईट किंवा उपग्रह विनाशक क्षेपणास्त्राची चाचणी केली असावी असे सांगत अमेरिकेच्या पेंटागॉनने भारताची बाजू घेतली आहे. मार्च २७ रोजी भारताने उपग्रह विनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आणि असा मान मिळवणारा अमेरिका, रशिया व चीननंतरचा चौथा देश ठरला.

 

भारताच्या या चाचणीचं देशात उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, अमेरिकेने यामुळे अवकाशात होणार्‍या कचर्‍याचे व धोक्याचे कारण पुढे करत नाराजी व्यक्त केली. मात्र, आता अमेरिकेचे स्ट्रॅटेजिक कमांड कमांडर जनरल जॉन हेटन यांनी भारताची बाजू घेतली आहे. भारताने केलेल्या या चाचणीचा विचार करताना प्रथम हा विचार करायला हवा की भारताने हे पाऊल का उचलले असेल आणि याचे उत्तर असेच असावे की अवकाशामधून त्यांच्या राष्ट्राला काही धोका असल्याचे त्यांना वाटत असावे. त्यामुळे अवकाशामधल्या धोक्यापासून देशाचे रक्षण करणारी क्षमता आपल्याकडे असावी, असे भारताला वाटले असावे, असे हेटन यांनी अमेरिकी सिनेटच्या लष्करी समितीला सांगितले आहे.

 

अवकाशामध्ये कचरा निर्माण करणारी क्षेपणास्त्र चाचणी भारताने का केली, असा प्रश्न सिनेट सदस्यांनी विचारल्यावर हेटन यांनी हे उत्तर दिले. भारताच्या चाचणीनंतर नासाने ही अत्यंत भयंकर गोष्ट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे अवकाशामध्ये या कचर्‍याच्या चारशे वस्तू फिरत असून त्यांच्यापासून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रांना धोका असल्याचं नासाने म्हटले होते. अवकाशामध्ये कसा वावर करावा याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने काही नियम घालून द्यावेत अशी सूचना हेटन यांनी केली आहे.

 

सिनेट सदस्य टीम कैन यांनी हा प्रश्न उपस्थित करताना चीनने २००७मध्ये केलेल्या चाचण्यांचा संदर्भ दिला. चीनच्या चाचणीमुळे कचर्‍याच्या एक लाख वस्तू अवकाशात तयार झाल्याचे व त्यातल्या अनेक आजही धोकादायक असल्याचे कैन म्हणाले. सोविएट रशियाच्या काळातल्या परंतु आता कार्यरत नसलेल्या एका सॅटेलाईटची अमेरिकी सॅटेलाईटशी टक्कर होता होता वाचली होती याची आठवणही कैन यांनी करून दिली. जर अवकाशामध्ये सॅटेलाईट्समुळे ट्रॅफिक जाम होणार असेल तर आपण काय विचार करायला हवा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. भारत हा काही शत्रूपक्ष नाही तर मित्रपक्ष आहे अशी पुस्ती जोडत कैन यांनी अवकाशाचा वापर करताना कुठली आव्हानं आपल्या समोर असतील याचा विचार करायला हवा अशी सूचना केली आहे. मात्र, या निमित्ताने भारताच्या चाचणीची दखल घेतानाच भारताला ही चाचणी का करावी लागली या अंगानेही अमेरिकेत चर्चा होताना दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@