नवी दिल्ली : उत्तर प्रदेश येथील भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याने पुन्हा एकदा वादग्रस्त वकत्व केले आहे. गरज पडली तर पुन्हा एकदा भीमा-कोरेगाव घडवू अशी मुक्ताफळे त्याने यावेळी उधळली. नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बहुजन हुंकार रॅलीमध्ये तो बोलत होता. तत्पूर्वी चंद्रशेखर आझादला मागील मंगळवारी देवबंद पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अटक केली होती.
चंद्रशेखर अझादने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आजच्या रॅलीमध्ये त्याने पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊ न देण्याची घोषणा केली. "मतदान करण्याअगोदर रोहित वेमुल्लाला आठवा. देशातील दलित हत्याकांड आठवा. आपल्या लोकांची कुर्बानी, अत्याचार विसरून तुम्ही मतदान करू शकता काय? असेही तो म्हणाला.
संविधानाचा प्रश्न येत असेल तर पुन्हा एकदा भीमा-कोरेगाव घडवण्याची मुक्ताफळे यावेळी त्याने उधळली. तो म्हणाला, "अत्याचारी हा अत्याचारी असतो. मनुवादाचे अंगीकरण करणारे कधीच तुमचे होऊ शकत नाहीत. आपण पुन्हा भीमा-कोरेगाव घडवू, सध्या त्याची गरज नसली तरी ज्या दिवशी संविधानाबाबत प्रश्न उभा राहील त्यावेळी पुन्हा एकदा भीमा-कोरेगाव घडवू." दरम्यान, यावेळी बोलताना त्याने पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व मुलायम सिंग यांच्यावर जोरदार टीका केली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat