राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2019   
Total Views |

 

राफेल विमान सौदा पुन्हा एकदा चर्चेत आहे. राफेल विमान खरेदी सौद्याचे दस्तावेज चोरीस गेल्याचे केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर पुन्हा आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यात आता खुलासा करण्यात आला आहे. जे दस्तावेज प्रसिद्ध झाले आहेत ते चोरी गेलेले आहेत, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील एक बाब मात्र स्पष्ट की, राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. यात एका पैशाचीही दलाली नाही, एका रुपयाचाही गैरव्यवहार नाही, असे अनेक माजी वायुदलप्रमुख, उपप्रमुखांनीही ठामपणे सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. विरोधकांचे तर आहेच. मोदी हे सेवाव्रती व जीवनव्रती आहेत. त्यांच्या काळात कोणताही गैरव्यवहार होणे शक्य नाही, असा विश्वास भाजपावर्तुळात व्यक्त केला जात आहे. दोघेही एक मिशन म्हणून काम करीत आहेत. त्यामुळेच तर आतापर्यंत त्यांच्यावर आरोप झाले नाहीत. त्यांच्या काळात राफेलच काय, कोणताही घोटाळा होऊ शकत नाही, हे जसे भाजपा नेत्यांना वाटते, तसेच ते अनेक विरोधी नेत्यांनाही वाटते. मोदी भ्रष्टाचाराबाबत बोलताना झिरो टॉलरन्सची भाषा बोलतात. त्यांनी ते करूनही दाखविले आहे. मग, कोणताही घोटाळा होण्याची शक्यताच नाही, असे भाजपा नेत्यांना वाटत आहे.

कारगिलची कहाणी

राफेलवर उटलसुलट चर्चा होत असतानाच, काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात हवाई चकमक झाली आणि त्यात भारताने एक मिग-21 विमान गमावले. त्याच दिवशी भारतीय वायुदलाचे एक हेलिकॉप्टर श्रीनगरजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. नेमकी हीच कहाणी कारगिल युद्धात घडली होती. कारगिल कारवाईच्या पहिल्या दिवशी भारतीय वायुदलाच्या सहा मिग विमानांनी घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली. यात चार मिग-27 विमाने होती, तर दोन मिग-21 विमाने होती. मिग-27 विमाने हल्ल्यासाठी वापरली जातात, तर मिग-21 विमाने त्यांना सुरक्षाकवच पुरवीत असतात. पहिल्या दिवशी फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताच्या मिग-27 विमानात बिघाड झाला. त्याने विमान सोडून पॅराशूटसह उडी मारली. त्याचा शोध दोन मिग-21 विमानांनी सुरू केला. त्यातील एक विमान स्वॉड्रन लीडर रेड्डी चालवीत होते, तर दुसरे विमान स्वॉड्रन लीडर अजय आहुजा चालवीत होते. दोघांनीही नचिकेताचा शोध घेण्याचे काम सुरू केले. रेड्डी यांच्या विमानातील इंधन संपत आल्याने, आहुजा यांनी त्यास परत जाण्यास सांगितले व शोधमोहीम आहुजा यांनी आपल्याकडे घेतली. त्या वेळी एका मिसाईलने त्यांच्या विमानाचा वेध घेतला व ते कोसळले. नंतर पाकिस्तानी घुसखोरांनी अजय आहुजा यांना गोळ्या घालून ठार केले. पाकिस्तानी घुसखोरांना अजय आहुजा यांचे मिग-21 विमान पाडता आले, कारण त्या विमानात मिसाईलचा शोध घेणारी अद्ययावत यंत्रणा नव्हती.

93 विमान अपघात

भारतीय वायुदलाला आधुनिक विमानांची किती तातडीने गरज आहे, याची कल्पना सरंक्षण मंत्रालयावरील एका संसदीय समितीच्या अहवालावरून सहज करता येईल. या अहवालात 2007 ते 2016 या काळात भारताने केवळ अपघातात गमावलेल्या विमानांची चर्चा करण्यात आली आहे. या काळात भारताने एकूण 93 विमाने अपघातात गमावली. साधारणत: 16 ते 18 विमानांचा एक स्क्वॉड्रन असतो. म्हणजे या नऊ वर्षांच्या कालावधीत भारताने आपल्या वायुदलातील पाच स्क्वॉड्रन केवळ अपघातात गमावले. यातील 44 विमाने मिग जातीची आहेत. याच मिग विमानांनी कारगिल युद्धात भारताला दगा दिला आणि याच मिग विमानाने नुकत्याच झालेल्या चकमकीत भारताला झटका दिला. या मिग विमानांनाफ्लाईंग कॉफिनम्हटले जाते ते यासाठी! दोन-तीन दिवसांपूर्वी शुक्रवारी आणखी एक मिग-21 विमान राजस्थानात कोसळले.

अपघातांचे विश्लेषण

या सर्व अपघातांचे विश्लेषण भारतीय वायुदलाने केले असून, त्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. अपघाताचे कारण, तांत्रिक, मानवी, याचाही शोध घेण्यात आला असून, मानवी दोष असल्यास तो वैमानिकाचा होता की ग्राऊंड सपोर्ट स्टाफचा होता, हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीचा होता, याचाही सविस्तर उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यानुसार 93 पैकी 36 विमान अपघातांचे कारण तांत्रिक होते, असे आढळून आले आहे. यातील बहुतेक विमाने मिग जातीची होती, हे विशेष! म्हणजे कालबाह्य झालेली मिग विमाने भारतीय वायुदलाला वापरावी लागत आहेत. भारताजवळ जग्वार, मिराज ही विमाने असली, तरी जग्वार विमानेही जुनी होत आहेत. म्हणजे सारी दारोमदार सुखोई व मिराज विमानांवर आहे. भारतीय वायुदलाजवळ असलेल्या हेलिकॉप्टरचा ताफाही जुनाट होत आला असून, त्याचेही तातडीने नवीनीकरण केले जाणे आवश्यक आहे. चारच दिवसांपूर्वी न्यू यार्क टाइम्सने, भारतीय वायुदल जुन्या काळातील विमाने कशी वापरीत आहे, याचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. लढाऊ विमान भारतात तयार करण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम इंदिरा गांधींनी 1983 मध्ये सुरु केला होता. त्यातूनच तेजस विमान तयार झाले. पण, ही विमाने तयार होण्याची गती भारतीय वायुदलासाठी पुरेशी नाही. आतापर्यंत फक्त दोन तेजस विमाने भारतीय वायुदलात सामील करण्यात आली आहेत. म्हणून भारत सरकारने नवी विमाने खरेदी करण्याचा शोध 2007 मध्ये सुरू केला होता. फ्रान्समध्ये तयार झालेले राफेल, की काही युरोपियन राष्ट्रांच्या समूहाने तयार केलेले युरोफायटर, हे दोन पर्याय भारत सरकारसमोर होते. यातून भारताने राफेल विमानांची निवड केली. 2015 मध्ये राफेल विमानांचा सौदा झाला. भारतीय वायुदलाला 128 विमानांची आवश्यकता असताना, पैशाअभावी भारताला फक्त 36 विमाने खरेदी करता आली. ही विमाने सप्टेंबरपासून भारतात येण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि 36 विमाने भारतात येण्यासाठी 2022 उजाडावे लागेल.

पाकिस्तानची तयारी

दुसरीकडे पाकिस्तानजवळ कमी विमाने असली, तरी अद्ययावत आहेत . पाकिस्तानही मिराज, एफ- 16, जेएस-17 थंडर ही विमाने वापरीत असला, तरी 2025 पर्यंत आपले वायुदल आधुनिक करण्याचे त्याने ठरविले असून, आता त्याचा मुख्य भर चिनी बनावटीच्या जेएस-17 थंडर विमानांवर आहे. ही विमाने पाकिस्तानात चीन-पाकिस्तान संयुक्त उपक्रमात तयार केली जात आहेत. 2025 पर्यंत पाकिस्तानी वायुदलात एफ-16 व थंडर ही प्रमुख दोनच जातींची विमाने असतील, असे सांगितले जाते.

तणाव कायम

भारत-पाकिस्तान यांच्या संबंधात हवाई चकमकीनंतर सध्या शांतता असली, तरी पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. पाक-अफगाण सीमेवरील जवळपास 90 हजार सैन्य त्याने भारत-पाक सीमेवर आणण्याचे काम सुरू केले आहे. 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात गोळीबार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने 155 मिलीमीटर तोफांचा वापर चालविला आहे. आपल्या आयुधनिर्माणींना दारूगोळ्याचा पुरवठा वाढविण्यास सांगितले आहे. याला भारताकडूनही जोरदार उत्तर दिले जात असून, आणखी काही दिवस सीमेवर ही स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@