भारताची वाढती शस्त्रसज्जता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019   
Total Views |



या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)यांनी आपली ताकद जगाला दाखवून दिली. आधुनिक शस्त्रांच्या संचलनामुळे देशवासीयांना पुन्हा एकदा आश्वासन मिळते की, भारतीय सैन्य आपल्या देशाला असलेल्या सगळ्या सुरक्षेच्या धोक्यापासून या देशाचे रक्षण करण्यास समर्थ आहे. यावेळी सुद्धा संचलनामध्ये अनेक नवीन शस्त्रे दाखवण्यात आली, ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाची लढण्याची क्षमता आणि शस्त्रसज्जता अजून जास्त वाढणार आहे.


बाह्य सुरक्षेची आव्हाने वाढत असल्याने भारतीय लष्कर आणि सरकारने मोठा निर्णय घेऊन २०१९ सालामध्ये १० महत्त्वाच्या शस्त्रप्रणाली भारतीय सैन्यात आणण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे भारताची लढाऊ क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. ही शस्त्रप्रणाली पुढील एका वर्षाच्या आत सैन्यदलात प्रवेश करणार आहे.

 

सुखोईपेक्षा दुप्पट क्षमतेचे राफेल

 

यात सर्वप्रथम असेल ते राफेल विमान. वास्तविक सैन्यात हे विमान दाखल होण्यास खूप उशीर झाला आहे. कारण, त्यावरती निर्माण केलेली भ्रष्टाचाराची कहाणी. पण, हे विमान या वर्षाच्या शेवटी हवाई दलात दाखल होणार आहे. ३६ विमाने आणल्यामुळे हवाई दलाची लढाऊ क्षमता प्रचंड वाढणार आहे. राफेल विमानातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही विमाने अत्याधुनिक आहेतच, पण त्यात नवीनतम यंत्रे, आयुधे बसवलेली आहेत. त्यामुळे ते जगातील सर्वोत्तम विमान समजले जाते. ते आपल्याला चीन विरूद्ध लेह-लडाख भागात सुद्धा वापरता येणार आहे. एक राफेल विमान सध्याच्या अत्याधुनिक सुखोई विमानापेक्षाही दुप्पट क्षमतेचे आहे. याला ‘फिफ्थ जनरेशन विमान’ समजले जाते. त्यामुळे हवाई दलाची कमी होणारी युद्ध क्षमता नक्कीच वाढणार आहे.

 

चीन विरूद्ध अग्नि-५ क्षेपणास्त्र

 

त्यापुढचे शस्त्र आहे ते म्हणजे अग्नि-५ क्षेपणास्त्र. पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त टप्पा असलेले हे क्षेपणास्त्र सैन्याच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याचे वजन १.५ टन असून त्यावर अण्वस्त्रही नेली जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्र लष्करात दाखल झाल्यावर चीनची सगळी शहरे आपल्या क्षेपणास्त्रांच्या पल्ल्यात येतील आणि चीन विरूद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे क्षेपणास्त्र आपल्याला मिळेल. यामध्ये असलेली इतर आयुधे अतिशय अधुनिक आहे. हे क्षेपणास्त्र थांबवणे चीनला जवळपास अशक्य आहे. भारताची गुप्तहेर संस्था नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ‘एनटीआरओ’ करता शत्रूच्या क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्याकरिता एक जहाज बांधण्यात येत आहे. २०१४ मध्ये या कामास सुरूवात झाली होती. या वर्षी ते सैन्यदलात सामील झाले तर ते कौतुकास्पदच असेल. या जहाजामुळे समुद्रातून येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रावर आपल्याला लक्ष ठेवता येईल.

 

सेकंड स्ट्राईक क्षमतेकरिता अरिहंत पाणबुडी

 

काही महिन्यांपूर्वी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी अरिहंत नौदलात तैनात झाली. तिने आपल्या किनारपट्टीजवळ गस्त घालून आपली क्षमता सिद्ध केली. ३५ वर्षांनंतर अशा प्रकारची पाणबुडी तयार करण्यात आपल्याला यश आले आहे. आता त्याची दुसरी आवृत्ती ‘आयएनएस अरिहंत’ तयार करण्यात येते आहे. आपल्याला चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांविरूद्ध अणुयुद्धाचा प्रसंग आल्यास सेकंड स्ट्राईकच्या क्षमतेकरिता अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. अशा पाणबुड्यांना पाण्याच्या आत शोधणे अतिशय कठीण असते. मात्र, आपल्याला ‘आयएनएस रिहान’ सारख्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आणखी दोन-तीन पाणबुड्यांची गरज आहे. याच वर्षी ‘आयएनएस अरिहंत’ सैन्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही वर्षांत इतर पाणबुड्याही सैन्यदलात प्रवेश करतील. त्यामुळे आपली सेकंड स्ट्राईक क्षमता वाढणार आहे.

 

वर्षाअखेरीपर्यंत कलवारी दर्जाच्या पारंपरिक पाणबुड्या नौदलात

 

आपल्या नौदलाकडील पारंपरिक पाणबुड्यांची संख्या २५ हून अधिक असायला हवी. ती १३ हून कमी झालेली आहे. म्हणजेच आपल्याला नवीन पारंपरिक पाणबुड्यांची गरज आहे. याकरिता दुसरी आणि तिसरी कलवारी दर्जाची पारंपरिक पाणबुड्या प्रोजेक्ट ३७५ साठी बनवण्यात येत आहे. त्यांचा नौदलात या वर्षाअखेरीपर्यंत समावेश होण्याची शक्यता आहे.

 

अपाची आणि सीएच-४७ एफ हेलिकॉप्टर

 

अपाची एएच ६४ पी हे पुढचे शस्त्र म्हणजे हल्ला करू शकणारे हेलिकॉप्टर, मार्च अखेरपर्यंत भारतात येऊ शकेल. याचा वापर अमेरिका, युरोप यांनी सोमालिया, इराक, अफगाणिस्तान युद्धात केला आहे. या विमानावर ३० मिलीमीटरची तोफ बसवली आहे, ती १२०० राऊंड फायर करू शकते. त्याशिवाय त्यावर ७० मिलीमीटर रॉकेट बसवली आहेत. अपाची रॉकेट आणि शेल फायर नावाचे क्षेपणास्त्र पण फायर करू शकते. भारताला रशियाचे एमआय- ८ हेलिकॉप्टर चालवण्याची सवय आहे. आता अपाची हे अटॅक हेलिकॉप्टर आल्यामुळे याचा वापर आपल्याला पारंपरिक युद्धात करता येईल. यापुढील नवीन शस्त्र आहे सीएच-४७ एफ हेलिकॉप्टर. याची वजन वाहाण्याची क्षमता प्रचंड आहे. याला हायअल्टीट्यूड भागात वापरता येते. त्यामुळे तोफखान्याच्या तोफा हेलिकॉप्टरने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जायच्या असतील तर याचा वापर होऊ शकतो. याशिवाय नवीन मल्टिरोल हेलिकॉप्टर नौदलासाठी विकत घेत आहोत. पुढील वर्षभरात ते नौदलात सामील होईल.

 

तोफखान्याची ताकद वाढणार

 

त्याशिवाय नवीन तयार झालेले एम ७७ लाईट वेट तोफ आणि के-९ व्रज या दोन तोफा भारतीय तोफखान्यात सामील होत आहेत. त्यामुळे भारतीय तोफखान्याची ताकद वाढणार आहे. १९८८ सालामध्ये बोफोर्स तोफांनंतर तोफखान्यात नवीन तोफा भारतीय सैन्यात सामील झाल्या नव्हत्या. आता या तोफा सैन्यात आल्या आहेत. या तोफा भारतीय निर्मिकांनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बनवल्या आहेत. ‘लार्सन अॅण्ड टुर्बो’ आणि ‘भारत फोर्ज’ने या तोफा बनवल्या आहेत. यांचा दर्जा अत्युत्तम आहे.

 

भारत-चीन सीमेवर वेगाने पोहोचता येणार

 

सैन्याला जशी अत्याधुनिक शस्त्रांची गरज असते त्याशिवाय आपल्याला पायाभूत सोयीसुविधा जसे रस्ते, रेल्वेलाईन, विमान तळे यांचीही गरज असते. तशीच गरज पूर्ण करणारा एक पूल बोगीबेल हा पूल ब्रह्मपुत्रेवर ईशान्य भारतात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडे तैनात असलेल्या सैन्याला उत्तरेला भारत चीन सीमेवर जाऊन वेगाने पोहोचता येईल. चीनशी मुकाबला करण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला अजून जास्त पायाभूत सुविधा ईशान्य भारत आणि लडाखच्या भागात तयार करावी लागतील. आता ईशान्य भारतामध्ये रस्ते निर्माणाचा वेगही वाढला आहे. ज्या रस्ते, रेल्वेलाईन आणि विमानतळांचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते ते आता झपाट्याने पूर्ण होत आहे.

 

चीनला रोखण्यासाठी अंदमान-निकोबार द्वीपसमूहांचा वापर

 

हिंदी महासागरात चीनचा प्रभाव वाढत असताना भारताने अंदमान-निकोबार द्वीपसमूहांवर पुढील १० वर्षांमध्ये ५,६५० कोटी रुपये खर्चाच्या लष्करी पायाभूत विकास योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात भारताकडून अतिरिक्त युद्धनौका, विमाने, ड्रोन, मिसाइल बॅटरी आणि पायदळ सैनिक तैनात केले जाणार आहेत. पोर्ट ब्लेअर आणि कार निकोबारमधील दोन मुख्य विमानतळे वाढवण्यात येणार आहेत. तसेच, उत्तरेकडील शिबपूरमध्ये नौदलच्या हवाई ठाण्यांवरील धावपट्ट्याही वाढवण्यात येणार आहेत. तसेच मोठ्या विमानांच्या संचालनात मदत व्हावी म्हणून दक्षिणेत कॅम्बबेल बे १० हजार फूटांपर्यंत वाढवला जाणार आहे. कामोर्टा द्वीपावर १० हजार फूटांची आणखी एक धावपट्टी निर्माण करण्याची योजना आहे. चीनच्या रणनीतिक हालचालींशी मुकाबला करण्यासाठी अंदमान आणि निकोबार कमांड प्रभावीपणे कार्य करू शकते. या सगळ्यामुळे येत्या काळात चीन आणि पाकिस्तान या पारंपरिक शत्रूदेशांचे आव्हान पेलण्यास अधिक सक्षम होणार आहे. ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@