मुंबई : 'रामायण' प्रत्येक भारतीयाच्या 'डीएनए'मध्ये आहे. रामायण हे भारतीय जीवनमूल्यांचे एक प्रतिक असून रामायण प्रेम, आदर, आज्ञाधारकता, सत्य आणि त्यागाची कथा आहे. असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करणारी महागाथा असलेल्या या महाकाव्यामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येईल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.
राज्य पर्यटन विभागाच्यावतीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले, बौद्ध, शीख आणि जैन याव्यतिरिक्त विविध भारतीय भाषांमध्ये रामायणाची अनेक भाषांतरे आहेत. कंबोडियन, इंडोनेशियन, फिलिपिनो, थाई, लाओ, बर्मा आणि मलयियन आवृत्ती रामायण आणि तिच्याशी संबंधित कथा देखील आपल्याला पाहायला मिळतात. रामायण ही एक अशी कथा आहे जी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत,जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये,बऱ्याच परदेशी भाषा आणि बऱ्याच बोलीभाषांमध्ये सांगितली जात आहे. रामायण इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आणि इतर परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्यांकडे जगभरातील अनेक विद्वान,दार्शनिक आणि विचारवंतांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे राज्यपाल यांनी याप्रसंगी सांगितले. रामायण हे आजच्या पिढीशी सुसंगत असल्याने महाराष्ट्रातील विद्यापीठांनी रामायण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वास्तूंचा अभ्यास करण्याचे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी केले.
पर्यटनमंत्री रावल यावेळी म्हणाले, आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवामुळे रामायणातील मूल्यांची माहिती जगभरातील लोकांना आणि नव्या पिढीला होणार आहे. रामायणातून आपल्याला जीवनमूल्यांची ओळख तर होतेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव, स्वार्थविरहित जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते. या महोत्सवामुळे देशभरातील रामायण सर्किटच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवात सध्या चार देश सहभागी झाले आहेत. विविध देशांना एकत्र आणण्यात रामायण महोत्सव महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे पर्यटन मंत्री यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद- सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे उपस्थित होते.
भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स आणि इंडोनेशियाचा महोत्सवात सहभाग
पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत बांद्रा कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव होणार असून यात भारतासह कंबोडिया,फिलिपाइन्स आणि इंडोनेशियातील कलाकार सहभागी होणार आहेत. त्या-त्या देशातील विविध स्वरूपांतील रामायणाचे सादरीकरण करणार आहेत. आज शुभारंभप्रसंगी भारतातील गणेश नाट्यालय संस्थेने रामायण सादर केले. उद्या, २६ फेब्रुवारी रोजी कंबोडियातील रॉयल बॅलेट ऑफ कंबोडिया आणि कोम्मा बसाक असोसिएशन, २७ फेब्रुवारी रोजी फिलिपाईन्समधील इंटिग्रेटेड परफॉर्मिंग आर्टस् गील्ड तर २८ फेब्रुवारी रोजी इंडोनेशियातील संगार परिपूर्णा हे ग्रुप या रामायण महोत्सवात सादरीकरण करणार आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat