नया है वह...
शिवाजी पार्क दादरच्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसे खूप काही अनावश्यक, अर्थहीन आणि कशाला कशाचा संदर्भ नसलेली वक्तव्येही केली. पण या साऱ्या वक्तव्यांचे मुकुटमणी ठरावे, असे विधान म्हणजे अलुतेदार-बलुतेदार हे कारागीर व कलाकार आहेत. त्यांना आम्ही कुठचेही तारण न घेता ९० टक्के कर्ज देऊ. आता या वाक्याला मुकुटमणी का म्हणावे वाटते तर कोणतेही तारण न घेता हे महाशय ९० टक्के कर्ज देणार आहेत? तेही फक्त अलुतेदार-बलुतेदार लोकांनाच बरं का? प्रकाश आंबेडकरांचे एकंदर सामाजिक वास्तव आणि ऐतिहासिक भान पाहिले की, खरंच वाईट वाटते. वंचित समाजाच्या नावाने सभा घेणाऱ्या या स्वयंघोषित वंचितांच्या तारणहारास सध्या भारतामध्ये वंचित तसेच पारंपरिक कारागीर समाजाचे वास्तव काय आहे, याचेही भान नाही. कारागिरी किंवा कलाकारी ही कोणा एका जातीत जन्म घेतलेल्याची मक्तेदारी नाही. अलुतेदार आणि बलुतेदार पद्धती परस्परावलंबी व्यवस्था होत्या. काही प्रमाणात त्या आजही आहेत. पण जातीनिहाय परंपरागत व्यवसाय करण्याचे सक्तीचे काम आता बहुतेक सगळ्याच जातींनी सोडले आहे. मात्र, वंचित आघाडीची सभा घेताना समाजाला पुन्हा अलुतेदारी आणि बलुतेदारीमध्ये गुंतवण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांनी घातला आहे. किती दुर्दैव की, जातीनुसार व्यवसाय करण्याचा तेवढा पर्याय शिल्लक ठेवणाऱ्या आणि त्यानुसार जातीच्या भिंती कायम ठेवणाऱ्या परंपरागत व्यवसायाची सक्ती करणाऱ्या व्यवस्थेवर बाबासाहेबांनी प्रहार केले. मात्र, बाबासाहेबांच्या वंशात जन्मलेल्या प्रकाश आंबेडकरांनी मात्र वंचित समाजाला पुन्हा त्यांच्या जातीनिहाय कामात गुंतवून ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जन्माने कुणाचेही कर्तृत्व ठरत नाही किंवा वंशपरंपरेने कुणालाही सर्जनशिलता विद्वत्ता जन्मतःच येत नाही. त्यामुळे एका समाजात जन्म घेतला म्हणून त्या व्यक्तीला कारागीर, कलाकार समजणे हे तर खूपच हास्यास्पद आहे. कारण अलुतेदारी-बलुतेदारी कामे पूर्वी होती, ती केवळ समाजव्यवस्थेचा भाग होती म्हणून. आता ते निकष बदलले आहेत. मात्र, कोरेगाव-भिमानंतर प्रकाशझोतात आलेले प्रकाशराव हे निकष समजूच शकत नाहीत. थोडक्यात काय तर नया है वह...
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat