काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात आपल्या लष्करावर १४ फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्करावर झालेला हा हल्ला खरोखर निंदनीय आहे. नेहमीप्रमाणेच या हल्ल्याचेही धागेदोरे पाकिस्तानातच जातात यातही आता काही नवल राहिलेलं नाही. या व इतर हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना आणि भारतीय नागरिकांना नुसतीच श्रद्धांजली देत बसण्यापेक्षा या हल्ल्यांचे सूत्रधार जिथे आहेत त्या पाकिस्तानलाच एखादा जबर तडाखा देता आला, तर कोणाला आवडणार नाही? आता भारताने स्वत:हून कधीही शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले नाही आणि पुढेही करण्याची शक्यता नाही. पण, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एक असे शस्त्र आपल्याकडे आहे, ज्यासाठी एकही गोळी चालवायची गरज नाही. हे शस्त्र आहे पाणी. पाकिस्तानला पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या मोठ्या नद्या हिमालयात उगम पावतात आणि भारतातून जातात. या नद्यांमार्गे पाकिस्तानला जाणारे पाणी जर आपण अडवले, तर पाकिस्तानमधील अनेक मोठ्या शहरांचा पाणीपुरवठाच बंद होईल. हे जाणूनच भारत सरकारने निर्णय घेतला की, आपले पाणी पाकिस्तानात जाऊच द्यायचे नाही. आपण या विषयाकडे राजकीयदृष्टीने बघण्यापेक्षा भूशास्त्रीयदृष्टिकोनातून आणि थोडेसे अभियांत्रिकीयदृष्टीने बघू. तत्पूर्वी आपण या पाण्याच्या देवाणघेवाणीस कारणीभूत असलेल्या ‘सिंधु जलकरारा’ची अगदी थोडक्यात माहिती घेऊ.
भारताने पूर्ववाहिनी नद्यांपैकी रावी नदीवर आठ, बियास नदीवर तीन, आणि सतलज नदीवर तीन धरणे बांधली आहेत. तीन नद्यांवर १४ धरणे म्हणजे चांगलेच प्रभावी कार्य आहे, पण भारताच्या प्रदेशातील पश्चिमवाहिनी नद्यांवर मात्र ही प्रगती फारशी नाही. सिंधु नदीवर एक, झेलम नदीवर एक आणि चिनाब नदीवर तीन अशी केवळ पाच धरणे पश्चिमवाहिनी नद्यांवर आजपर्यंत बांधण्यात आली आहेत. अर्थात, या करारातील निर्बंधांमुळे या तीन नद्यांवर फार बांधकाम करणे शक्यही नाही, पण भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूभागातील पश्चिमवाहिनी आणि पूर्ववाहिनी नद्यांचे भारताच्या वाट्याचे पाणीही पाकिस्तानात जाते. कारण काय, तर भारताकडे ते पाणी साठवण्यास काही नाही. सध्या भारत त्याच्या वाट्याचा सुमारे ९३ टक्के जलसाठा वापरतो. आपले लक्ष हे १०० टक्के जलसाठा वापरणे आणि कोणताही करार न मोडता पाकिस्तानात जाणारे अतिरिक्त पाणी अडवणे हे आहे. मग आपण काय करू शकतो आणि सध्या काय करत आहोत? हे जाणून घेण्यासाठी आपण या नद्यांची थोडी प्राकृतिक माहिती घेऊ.
जगातील २१ वी मोठी आणि पाकिस्तानातून जाणारी सर्वात मोठी नदी म्हणजे सिंधु नदी. ही नदी मानस सरोवर येथे उगम पावते. तेथून ती थोड्या अंतरासाठी भारतात येते आणि भारतातून ती पाकिस्तानच्या ईशान्य भागात शिरून पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही नदी पाकिस्तानातील सर्वात मोठा जलस्रोत असून पूर्ण पंजाब प्रांताचा उत्पन्नाचा स्रोत आहे. ही नदी पंजाब प्रांतातील शेती आणि विविध उद्योगांसाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे तसेच, पाकिस्तानातील प्रमुख पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी नदी आहे.पाकिस्तानातील ७५ टक्के शेती ही सिंधु नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. सिंधुनंतर सर्वात लांब नदी आहे सतलज. ही नदी मानससरोवराच्या डावीकडील राक्षसतळ येथे उगम पावून हिमाचल प्रदेश आणि पंजाबमार्गे पाकिस्तानात सिंधु नदीला मिळते. पुढील नदी आहे चिनाब. हिमाचल प्रदेश येथे उगम पावून ही नदी काश्मीरमधून वाहत पाकिस्तानात सिंधु नदीला जाऊन मिळते. नंतर येते झेलम. काश्मीरमधील पीर-पंजाल येथे उगम पावून ही नदी काश्मीरमधून वाहत पाकिस्तानात जाते आणि चिनाब नदीला जाऊन मिळते. झेलमनंतर येते रावी. ही नदी हिमाचल प्रदेशातील बारा बंगहाल येथे उगम पावून काश्मीरमार्गे पाकिस्तानात जाते आणि चिनाब नदीला जाऊन मिळते. शेवटची नदी आहे बियास. हिमाचल प्रदेशात उगम पावून ही भारतातच सतलज नदीला येऊन मिळते. अशा प्रकारे पाकिस्तानातील सहा प्रमुख नद्या भारतातूनच जातात. या नद्या याच पाकिस्तानच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहेत. पाकिस्तानात अफगाणिस्तानातील हिंदू कुश पर्वतातूनही काही नद्या येतात, पण त्या एवढ्या मोठ्या नाहीत आणि उन्हाळ्यात त्या कोरड्या पडतात. म्हणून या सहा नद्याच पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या आहेत.
आधी म्हटल्याप्रमाणे, भारताच्या वाट्याचे पाणी पाकिस्तानला जाते. याचे कारण म्हणजे धरणांचा अभाव. तसेच भारताच्या वाट्याचे पाणी साठवून ठेवायला आपल्याकडे तेवढी मोठी जलाशयंही नद्यांच्या आसपास नाहीत. या नद्यांमधील पाणी दुसरीकडे न्यायचे म्हटले, तर आवश्यक ती कालव्यांची व्यवस्थाही अस्तित्वात नाही. तसा प्रयत्नच आजपर्यंत केला गेला नाही आणि तांत्रिकदृष्ट्या ते फार कठीणही आहे, पण अशक्य नाही. या सगळ्या नद्या हिमालयात उगम पावतात आणि वाहत वाहत पाकिस्तानात जातात. या सर्व नद्यांना त्यांचे पाणी हे उंचावरील हिमनद्यांमधून मिळते. हिमनद्या या साधारणपणे बारमाही असतात. त्यामुळे या नद्यांनाही भरपूर पाणी मिळते. आता उन्हाळ्यातही ज्या नद्यांना चांगल्यापैकी पाणी असते, तेथे पावसाळ्यातील परिस्थिती काय सांगावी? पावसाळ्यात या सगळ्या नद्यांना पूर येतात आणि या नद्या प्रचंड नुकसान घडवतात. या नद्यांचे पाणी अडवायचे म्हणजे जम्मू-काश्मीर भागातील पूरस्थितीचा विचार केला पाहिजे. याशिवाय कालवे खणून या नद्यांचे अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवणे हा खर्चिक प्रकल्प आहे. या सगळ्या नद्या हिमालयातून वाहतात आणि गेल्या अनेक लेखांमध्ये मी म्हटल्याप्रमाणेच हिमालय हा दोन खंडीय प्लेट्सच्या सीमेवर असल्यामुळे फार असंतुलित आहे आणि साध्या परिस्थितीतही तेथे भूकंपांचा धोका आहे. अशा ठिकाणी मोठे जलाशय वा कालव्यांचे बांधकाम केल्यास इथल्या क्रस्टवर म्हणजेच भूभागावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. समजा, भूरचनात्मकरित्या सर्व संतुलित आहे असे आपण मानले तरी जवळजवळ १० ते १५ वर्षे या प्रकल्पाला लागू शकतात.
(लेखक हे नागरी अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठातून भूभौतिकीय अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही घेत आहेत. तसेच अमेरिकेतील त्यांच्या सहकार्यांबरोबरच तेथेच त्यांचे शोधनिबंधही प्रसिद्ध झालेले आहेत.)
संदर्भ- https://www.rediff.com/news/interview/if-you-stop-water-to-pakistan-you-will-flood-jk/२०१६०९२४.htm, https://www.theguardian.com/world/२०१९/feb/२२/india-again-threatens-to-restrict-flow-of-river-water-to-pakistan-as-tension-builds, https://www.quora.com/Can-India-divert-Indus-and-Satlaj-rivers-towards-Rajasthan-desert-If-yes-what-would-happen-to-Pakistan, http://www.geologypage.com/२०१४/०८/indus-river.html, https://en.wikipedia.org/wiki/IndusšRiver, https://en.wikipedia.org/wiki/IndusšWatersšTreaty, https://www.britannica.com/place/Sutlej-River, http://india-wris.nrsc.gov.in/wrpinfo/index.php?title=DamsšinšIndusšBasin, https://www.youtube.com/watch?v=Kqe९FzpSZRI, https://www.youtube.com/watch?v=N४gs९ScxPWM
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat