गाडगेबाबांनी खर्या अर्थाने कर्तृत्व गाजविले आणि त्यांचा अभिनिवेशही बाळगला नाही. म्हणूनच मग मी हे हे करून ठेवले हे पुढच्या पिढीला कळावे, काळाच्या कुपीत आपल्या मुद्रेचा ठसा उमटलेला असावा, यासाठी अगदी संत म्हणविणारेही आटापिटा करताना दिसतात. आपला पंथ निर्माण करतात. पोथ्या करतात. आरत्या लिहिून घेतात अन् संप्रदाय, पूजाविधीही ठरवून मोकळे झालेले असतात... गाडगेबाबांनी यातले काहीच केले नाही, इथवरही ते सामान्यच म्हटले तरीही त्यांनी अत्यंत द्रष्टेपणाने ते होऊ दिले नाही. आपला फोटोही राहू नये अन् तसबिरी लावून अंगारे- धुपारे चालावेत, असे त्यांना अजीबातच वाटत नव्हते. त्यामुळे कुणी फोटो काढताना दिसला तर पुढच्या भेटीत ते त्याला अत्यंत प्रेमाने विचारत, ‘‘बाबू, माहा फटू काढलाना तुहा?’’ त्यावर तो अत्यंत उत्साहाने तो फोटो दाखवी अन् मग गाडगेबाबा त्या फोटोचे तुकडे करत. फिल्म असते फोटोची हेही माहीत होते त्यांना. तीही मागून जाळून टाकायचे... ‘‘कहाले पाह्यजेन फटू माहा?’’ असे ते विचारत अन् मग साहजिकच समोरून उत्तर येई, ‘‘तुमी नसतानी आठवन पाह्यजेना...’’ ‘‘म्हनजे तुमी तसबिर्या करान, पुतळे करान माहे अन् मग मंग हारफुलं वाहन्याची दुकानदारी सुरू करान... नको ना मले थे!’’ असे गाडगेबाबा म्हणत.
येत्या आठवड्यात संत गाडगेबाबा आणि गजानन महाराज या विदर्भलौकिक पुरुषांच्या तिथ्या येत आहेत. दोघांनाही नावाचा गलबला नव्हता. गजानन महाराजांना त्यांचे नावही माहिती नव्हते अन् हे नाव त्यांच्या वायबोलावरून त्यांना लोकांनी दिले. गाडगेबाबांनाही गाडगेबाबा हे नाव लोकांनी दिले. नंतर मग त्यांना नावरूप आल्यावर त्यांचे डेबुजी झिंगराजी जानोरकर हे नाव शोधून काढण्यात आले. त्यांनी तर नावा-गावासकट सगळेच त्यागून समाजासाठी संन्यास घेतला होता. त्यांचा देव हा माणूस होता. या माणसांच्या देवाचीच त्यांनी पूजा केली. भुकेला असेल त्यांचा हा देव, तर त्याला त्यांनी मिष्टान्नाचे भोजन दिले. दहा-दहा हजारांच्या गर्दीला त्यांनी पुरणपोळीचे जेवण दिले आणि स्वत: मात्र कुठल्यातरी अंधार्या झोपडीत जाऊन त्यांनी भाकर मागून खाल्ली आहे. त्यांचा हा माणसाचा देव भिकारी असेल, तर त्याला त्यांनी अंघोळ घालून स्वच्छ केले. या माणसांच्या देवाच्या वसाहती त्यांनी स्वच्छ केल्या, त्यांचे जिणे सुकर व्हावे, विज्ञाननिष्ठ होण्यासाठी त्याने बुद्धिनिष्ठ व्हावे यासाठी घसा फाडून कीर्तन केले. माणसाच्या या देवासाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. मंदिरे नाही बांधली अन् तिथे देवांच्या दगडी मूर्तीही नाही ठेवल्या. कर्मकांडाला प्रोत्साहन मिळेल, असे काहीही केले नाही. गोपाला गोपाला हे भजन म्हणायला लावले अन् देव कसा नाही, हे समजावून सांगितले. त्यामुळे स्वत:ची नाममुद्रा उमटावी, असा कुठलाही अट्टहास त्यांचा कधीही नव्हता...
डेबुजी झिंगराजी जानोरकर हा, तरुण सावकाराच्या पाशात अडकलेल्या मामाची दैना पाहून अन् अंधश्रद्धेच्या कचाट्यात सापडलेल्या समाज आणि आप्तांची अवस्था पाहून हेलावला आणि एका रात्री घर सोडून निघून गेला... त्यानंतर तो गाडगेबाबा अवस्थेतच ऋणमोचनच्या यात्रेत दिसला. या बारा वर्षांत नेमके त्याने काय केले, हे कुणालाच सांगितले नाही अन् समजूही दिले नाही. कुणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण आपल्या माणसाकडे आस्थेने न पाहण्याचा करंटेपणा आपण नेहमीच करत आलो आहोत. आपल्या माणसातला मोठेपणा मान्य करून त्याला त्या पद्धतीची वागणूक देण्याचे मोठेपण आमच्या ठायी कधीच नाही. आम्ही मग पुण्या- मुंबईच्या लोकांना ते कमी कुवतीचे असूनही कसे मोठे होतात, यासाठी कोसत असतो. गाडगेमहाराजांचे काम खूप मोठे आहे आणि त्यांची वैचारिक बैठक आभाळाच्या उंचीशी अन् समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारी आहे, हे आम्ही दिसत असूनही मान्य केले नाही. डेबुजी भैताडला, अशीच संभावना आम्ही केली. दगडांचे टाळ करून कीर्तन-भजन करतो बेटा, म्हणत त्याला बाहेरची बाधा झाली म्हणत त्याच्या आईला त्यावर इलाज करण्याचा सल्ला दिला... बाबांच्या कामाचा अवाका वाढत गेला. अगदी नाशिक, पंढरपूर, मुंबईपर्यंत ते पोहोचले. पंढरपुरात एकदा त्यांना आचार्य अत्रे भेटले अन् ‘‘इतके घाट स्वच्छ करता. इतकी कामे करता, मग कधी पांडुरंगाच्या दर्शनाला नाही गेले का?’’ असे अत्र्यांनी विचारले. बाबा काम करत राहिले अन् झाडू मारताना म्हणाले, ‘‘असन तो (पांडुरंग) तर येईन ना भेट्याले बाहरं...’’ या उत्तराने हा माणूस बाह्य वेशाने बावळा वाटत असला तरीही अंतरी नाना कळा असलेला आहे, हे आचार्य अत्रेंसारख्यांना सांगण्याची गरज नव्हती.