कामगार संघटना म्हणजे तणाव आणि प्रचंड संघर्ष. त्यातही ‘प्रतिरक्षा’ क्षेत्रामधील कामगारांच्या हक्कासाठी उभे राहणे म्हणजे मोठी जबाबदारी. पण, ही जबाबदारी सुजाता पाटील समर्थपणे बजावत आहेत, त्यांची कहाणी...
“भारत-चीन युद्धामध्ये आपल्या कितीतरी वीर सैनिकांना सीमेवरील बर्फामुळे जखम झाली. जखमेला गँगरीन झाले आणि या योद्ध्यांचे हकनाक पाय कापावे लागले. त्यावेळी सैनिकांसाठी बर्फाळ प्रदेशासाठी वापरायचे बूट, इतर अत्यावश्यक पोषाख सरकारच्या प्रतिरक्षा कारखान्यात बनवले होते. मात्र, तेव्हा प्रतिरक्षा क्षेत्रातील कम्युनिस्ट कामगार संघटनांनी संप पुकारला. ‘चाहे जो हो मजबुरी हमारी मांगे हो पुरी,’ असे म्हणत त्यांनी संप केला आणि सैनिकांना वेळेवर बूट आणि इतर अत्यावश्यक वस्तू मिळाल्या नाहीत. त्याचे गंभीर, दुर्दैवी परिणाम भारतीय सैनिकांना आणि देशालाही भोगावे लागले. त्यावेळी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडींनी ‘प्रतिरक्षा’ विभागातही ‘तेरा वैभव अमर रहे माँ’ म्हणत देशासाठी सर्वोच्च निष्ठा असणार्या कामगार संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेची म्हणजे ‘भारतीय मजदूर संघा’ची कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे,” असे सुजाता पाटील सांगत होत्या. कामगार संघटनांमध्ये महिलांचा सहभाग तसा नावालाच असतो. मात्र, सुजाता पाटील याला अपवाद आहेत. त्या ‘मशीन टुल्स प्रोटोटाईप फॅक्टरी अंबरनाथ’ या सरकारी कंपनीत कार्यरत आहेत. तसेच त्या ‘भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघा’च्या केंद्रीय संयुक्त सचिव आणि मजदूर संघाच्या राष्ट्रीय महिला विभागाच्या प्रभारी आहेत.
मूळ जळगावच्या विलास यादव अत्तरदे आणि सुनंदा अत्तरदे यांच्या सुजाता या कन्या. विलास कामानिमित्त अहमदाबादला असायचे. त्यामुळे सुजातांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण अहमदाबादमधलेच. पण, मुलांनी मातृभाषेतून शिकावे असे विलास यांना वाटे. त्यामुळे विलास यांनी सुजाता यांना शिकण्यासाठी जळगावच्या कमल मावशीकडे पाठवले. मावशीचे घर संघ विचारांचे, सुसंस्कृत. काका शिक्षक. त्यामुळे सुजाता यांना तिथे चांगले संस्कार मिळत होते. सुजाता सहावीला असल्यापासून मोठ्या मावस बहिणीसोबत अभाविपच्या कार्यालयात जायच्या. ‘राष्ट्र प्रथम’ या विचारांचे बीज तिथेच त्यांच्यात रूजले. दहावीनंतर त्यांना इंजिनिअरिंग करायचे होते. मात्र, नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते.
सुजाता यांच्या पुढील शिक्षणाच्या नियोजनासाठी आणि कुटुंब अहमदाबादहून जळगावला यायला निघाले. मात्र, त्यादरम्यान तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. अत्तरदे कुटुंबावर आकाश कोसळले पण, स्वाभिमानी सुनंदा यांनी हार मानली नाही. त्या शिवणकाम करतच होत्या. काटकसर करून त्यांनी संसार चालवायचे ठरवले. सुजाता यांच्या आयुष्यातही बदल झाला. मिळेल ते शिक्षण घेऊन, पटकन कामाला लागून घरची जबाबदारी घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे त्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. प्रशिक्षण पूर्ण केले. त्यावेळी रक्षा मंत्रालयाकडून आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचे अर्ज निघाले. सरकारी कंपनीमध्ये प्रशिक्षण मिळाल्यावर नोकरी मिळू शकते, असा विचार करून आईने सुजाताला मुंबईला प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.
सुजाता प्रशिक्षणासाठी काकांकडे राहू लागल्या. प्रशिक्षण पूर्ण झाले आणि सरकारी नोकरीही मिळाली. पुढे त्यांचा मिलिंद पाटील यांच्याशी विवाह झाला. नोकरी मिळाल्यानंतर कंपनीतल्या अनेक कर्मचारी संघटनांशी सुजाता यांनी संपर्क केला. ते त्यांचे दैनंदिन कामच असते. पण त्यावेळी सुजाताच्या मैत्रीण रश्मी परब या ‘भारतीय मजदूर संघा’चे काम करायच्या. सुजाता यांच्यावर लहानपणापासून ‘राष्ट्र प्रथम’ मानणार्या रा. स्व. संघाचे संस्कार झालेले. त्यामुळे त्यांनी ‘भारतीय मजदूर संघा’चे सदस्यत्व स्वीकारले. पुढे त्यांच्यावर अनेक जबाबदार्या येत गेल्या. ‘भारतीय मजदूर संघा’च्या ‘प्रतिरक्षा’ विभागात त्या समर्थपणे आपली जबाबदारी सांभाळू लागल्या. भा. म. संघही सुजातांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. कारण, सुजाता यांची कारकिर्द तशी न्यायिक वादळीच म्हणायला हवी.
त्याचे असे झाले की, कंपनीमध्ये लाल बावट्यावाल्यांनी संप पुकारला. या संपामध्ये भारतीय मजदूर संघ सामील झाला नाही. त्यामुळे सुजाता त्या दिवशी कंपनीत जाऊ लागल्या. कंपनीत प्रवेश करताच लाल बावट्याच्या एका पदाधिकार्याने चारचाकी वाहन त्यांच्या अंगावर घातले. त्या धडपडून पडल्या, त्यांना लागले. पण, क्षणात सावध होऊन त्यांनी आरडाओरड केली. कंपनीतले सुरक्षा रक्षक इतर कर्मचारी धावून आले आणि सुजाता यांचा जीव वाचला. इतकेच नव्हे, तर संध्याकाळी सुजाता घरी जाऊ लागल्या, तेव्हा त्या पदाधिकार्यांनी सुजाता यांना अर्वाच्च शब्दात धमक्या देण्यास सुरुवात केली. त्याच वेळी सुजाता यांना कळले की, याच पदाधिकार्यांनी कंपनीतील भा. म. संघटनेच्या इतर तीन महिला कार्यकर्त्यांनीही धमकी दिली की, ‘तुम्ही घरी जा, संप आहे नाहीतर परिणाम वाईट होईल.’ हे सगळे पाहून सुजाता यांनी ठरवले की, अशा व्यक्तीला धडा शिकवायलाच हवा.
त्यांनी त्या महिलांसोबत कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यावेळी सुजाता या लाल बावट्याचा सदस्य असलेल्या कर्मचार्याला निलंबित करा, असेही सांगू शकत होत्या. मात्र, त्या अधिकार्याची पत्नी आणि छोटी मुलगी पाहून त्यांनी या अधिकार्याचे केवळ दोन पगारवाढ रोखण्याची मागणी केली. ती कंपनीने पूर्ण केली. पुढेही त्या व्यक्तीने भारतीय मजदूर संघाच्या महिला कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र सुजाता त्याच्या संघटनेच्या वरिष्ठांना भेटल्या. ‘तुमच्या पदाधिकार्याला समजावा नाही, तर परिणाम भोगा,’ असे ठणकावले आणि तो सुधारला. एका महिलेसाठी हे सगळे संघर्ष कमालीचे तणावाचे असतात. पण सुजाता यांनी कामगार संघटनेचे काम अखंडितपणे सुरू ठेवले. त्या म्हणतात,“माझ्या कामासाठी माझे कुटुंब नेहमी माझ्यापाठी ठाम उभे राहते. कारण, हे ईश्वरी कार्य आहे. राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित हेच ध्येय घेऊन मला कामगारक्षेत्रात काम करायचे आहे.”