वृक्षतोड होणार नसल्याचे शिवसेनेचे स्पष्टीकरण
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील प्रस्तावित स्मारकासाठी पाच हजार झाडांची वृक्षतोड केली जाणार असल्याच्या वृत्तामुळे शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. आरे वृक्षतोडीवर आक्रमक असणाऱ्या शिवसेनेवर अमृता फडणवीस यांनीही टीका केली आहे. "ढोंगीपणा हा आजार आहे, गेट वेल सुन शिवसेना, तुम्हाला कमिशन मिळणार असल्याने हे अक्षम्य पाप तुम्ही करत आहात.", असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
आरे वृक्षतोडीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेवर औरंगाबाद येथे केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीवरून ताशेरे ओढण्यात येत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यानंतर शिवसेनेने सारवासारव करत वृक्षतोड होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी माहिती देत वृक्षतोड करणार नसल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.